Friday, April 16, 2021

देव-देवक/ग्रहमख (अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपलं सगळ्यांच मनःपूर्वक स्वागत. आपण आत्तापर्यंत वधुस कुंकू लावणे, साखरपुडा आणि गहू टिपणे ह्याबद्दल माहिती करून घेतली आहे. आपल्या लग्नसमारंभ ह्या लेखांना किंवा पोस्टना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, तुमच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून मिळत आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आपल्या ह्या पोस्ट (भारतात) सर्वात जास्त पुण्यात वाचल्या जातात तर भारताबाहेर अमेरिकेत वाचल्या जातात, कॅनडा, दुबई मध्ये देखील वाचकवर्ग आहे. मी आपल्या सर्व वाचकांना धन्यवाद देतो आणि आपल्या विषयाकडे येतो.

आज आपण "देव देवक" किंवा ग्रहमख ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. लग्नाला अगदी काही दिवस राहिले की देव देवता आणि ग्रहांचे पूजन केले जाते. शक्यतो देवक हे लग्न किंवा मुंजेच्या आधी समसंख्येने म्हणजे दोन, चार किंवा सहा दिवस ह्या प्रमाणे स्थापले जाते. एकदा देव देवक झाले की लग्नविधी मध्ये सोयर सुतक आले तरी त्याची अडचण होत नाही, पूढील कार्य निःसंकोचपणे पार पाडता येतात.

सकाळी घरातील देव-देवतांचा आशीर्वाद घेऊन वराकडून/वधुकडून घराच्या मुहूर्तमेढीची पूजा केली जाते.

या दिवशी नवग्रह पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, घाणा, जात्याचे पूजन, तसेच नंदिनीं देवतांचे पूजन, तसेच यज्ञ/हवन केले जाते. वधु/वर आई वडील आणि करवली यांच्या हस्ते हे कार्य पार पाडले जाते. 

ग्रहमखाच्या वेळी घरचा आहेर देण्याची प्रथा आहे. घरातील मंडळी म्हणजेच  वर किंवा वधूचे जवळचे नातेवाईक किंवा आईचे माहेरचे या वेळी पहिला आहेर देतात.  

आपल्याकडे आंब्याच्या वृक्षाला शुभकार्यात अढळ स्थान आहे, आंब्याच्या पानांच्या माळा, कलशावर आंब्याची पाने, तोरण तर ग्रहमखासाठी नंदिनी देवता तयार केल्या जातात, आंब्याच्या छोटया डहाळ्या घेऊन त्यास आंब्याचे पान गुंडाळून वर धागा बांधला जातो  अशा या सहा नंदिनीं देवतांचे पूजन करण्याचा प्रघात आहे शास्त्रानुसार त्यांना नांदीन्यादि मंडप देवता असे म्हणतात.. 

आपण जो दारापुढे मंडप घालतो त्यास पूर्वी ५ खांब असत चहूबाजूला ४ आणि १ खांब  मध्ये आधारस्तंभ असे एकूण ५  खांब  तसेच मंडपाच्या प्रवेशद्वारी १ खांब असे तो ६ वा खांब. ह्या सहा खांबांना ह्या देवता आवाहन आणि पूजन करून बांधल्या जात असत त्या पुढील प्रमाणे नंदिनी, नलिनी, मैत्रा, उमा, पशुवर्धिनी ह्या पाच मंडपात आणि मंडपाचे रक्षण करण्यासाठी सहावी मंडपाबाहेर शस्त्रगर्भा भगवती. हल्ली मंडपाची पूर्वीसारखी पावित्र्यता राखता येत नसल्या कारणाने त्यांस घरात  देवकाशेजारी सुपामध्ये पूजन करून स्थानापन्न केले जाते. 

नंदीनी देवतांचे पूजन


घाणा :- रोवळी (बांबू पासून बनवलेली उखळी) मध्ये दोन मुसळ ठेवली जातात दोन्ही मुसळांना एकत्र आंब्याच्या पानांची माळ घातली जाते. रोवळीमध्ये भात(साळी), उडीद, सुपारी, तांदूळ आणि हळकुंड घातले जातात आणि कांडले/कुटले जाते, वधु/वर आणि इतर ५ सुवासिनी मिळून ही रित करतात सोबतीला पारंपरिक गाणी असतातच. त्यास घाणा पाडणे/ भरणे असे म्हणतात.



पहिला घाणा घालू खंडिये भाताचा,
मंडपी गोताचा गणराज,

दुसरा घाणा घालू खंडिये गुलाल,
मंडपी दलाल गणराज,

तिसरा घाणा घालू खंडिये सुपारी,
मंडपी व्यापारी गणराज,

चौथा घाणा घालू खंडिये खारीक,
मंडपी बारीक गणराज,

पाचवा घाणा घालू खंडिये हळद,
मंडपी दळद गणराज.

तद्नंतर जात्यावर उडीद दळले जातात, जात्याला आंब्याच्या पानाची माळ घातली जाते, त्यात उडीद घालून वर/वधु आणि इतर स्त्रिया जात्यावर उडद्या मुहूर्त करतात. जात्यावर उडीद दळताना पारंपरिक गाणी गायली जातात.

जात्यानरे गणपती तुला तांदुळाचा घास,
वर/ वधू मोतीयाचा घोस.

जात्यानरे गणपती तुला सुपारी वाहिली,
वर/वधुस हळद लागली,

जात्यानरे गणपती तुला दूर्वाची जुडी,
अम्माघरी ग कार्य मोरया ग घाली उडी,

अशाप्रकारे आनंदात देवदेवक स्थापित केले जाते लग्न झाल्यानंतर त्याची उत्तरपूजा केली जाते. 

गाण्यांसाठी विशेष आभार:- माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत (पूर्वाश्रमीचे नाव), 
तसेच श्री प्रसाद तिवाड आणि श्री विजय पंडीत ह्यांचे खूप आभार.

धन्यवाद.

ऑर्डर साठी 9637847937 ह्या क्रमांकावर संपर्क करा











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


Friday, April 2, 2021

गहू टिपणे(अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः

नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपले सगळ्यांचे स्वागत, या लेखमालेतील हे तिसरे पुष्प आहे. आज आपण "गहू टिपणे" या प्रथेबद्दल माहिती करून घेणार आहोत. काही ठिकाणी यास भात हळदीचा मुहूर्त असे म्हंटले जाते मात्र अष्टागरात "गहू टीपणे" म्हणतात. मी वाचकांना आवाहन करतो की आपल्या या प्रथा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्धेशाने जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, फेसबुकवर शेअर करा जेणे करून आपल्या या रितिभाती सर्वश्रुत होतील.

साखरपुडा आटोपला की लगबग सुरू होते आमंत्रणांची, कुलस्वामिनी, ग्रामदेवता तसेच घरातील देवांना आमंत्रण पत्रिका देऊन झाली की बाकी आमंत्रणे केली जातात.  लग्नाला काही दिवस राहिले की गहू टिपण्याचा कार्यक्रम केला जातो, काही ठिकाणी आमंत्रणं सुरू करण्यपूर्वी सुद्धा हा कार्यक्रम शुभमुहूर्त म्हणून केला जातो.



वरपक्ष आणि वधुपक्ष दोन्ही ठिकाणी हा घरगुती कार्यक्रम केला जातो, वधूपक्ष आपल्या घरी आणि वरपक्ष आपल्या घरी (मुखत्वे स्त्रिया) हा कार्यक्रम पार पाडतात, ह्यासाठी शेजारील तसेच आळीतील स्त्रियांना खास आमंत्रण दिले जाते.

या दिवशी पहिली मुंडावळ बांधली जाते आणि शक्यतो जुनी मुंडावळ बांधण्याची प्रथा आहे. या कार्यक्रमात कोरे सूप घेऊन सुपास आंब्याच्या पानाची माळ बांधली जाते, त्यात गहू ठेवले जातात या गव्हांमध्ये पाच खडे, पाच खारका, पाच हळकुंड घातले जातात किंवा आपल्या प्रथेनुसार इतर गोष्टी घातल्या जातात, समई प्रज्वलित केली जाते. होणाऱ्या वधुचे किंवा वराचे औक्षण केले जाते, त्यानंतर ह्या सुपाभोवती स्त्रिया आणि वर किंवा वधु बसून गव्हांमघ्ये हात फिरवत पारंपारिक गाणी गातात. सोबत व्हीडिओ आहे तो नक्की पहा.

"सारवल्या भिंती, वर काढिले पोपट,
वधूचे/ वराचे नाव माझ्या ग बाळाच्या लग्नाची खटपट."

"सारवल्या भिंती वर काढिली ताम्हणं,
वधूचे/ वराचे नाव माझ्या ग बाळाच्या लग्नाची सामानं."

व्हीडिओ

केळवणासाठी लागणारी हळद खास वराकडून/ वधुकडून कुटून घेतली जाते. खलबत्त्याला गोल आंब्याच्या पानाची माळ बांधली जाते व त्यात हळद कुटली जाते. प्रथमतः वर/वधुकडून हळद कुटली की स्त्रिया उरलेली हळद कुटतात सोबत परंपरेने चालून आलेली गाणी गातात.

                                       व्हीडिओ

वराकडून मुहूर्तमणी आणि त्यात काळेमणी ओवून घेतले जातात. हा कार्यक्रम म्हणजे विवाहाची दिनांक जवळ आल्याची एकप्रकारे आठवणच आहे. हा कार्यक्रम अल्पउपहार करून संपन्न होतो.

पूर्वी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गहू, तांदूळ निवडले जात, पापड व इतर वाळवणं केली जात, लोणची मुरांबे करून लग्नासाठी लागणारी सर्व तयारी केली जाई.

"रात्री दळू गहू, दिवसा दळू पापडीच,
..........माझ्या ग बाळाचं लग्न आलं तातडीचं,"

"रात्री दळू गहू, दिवसा दळू पापड पिठी,
........माझ्या ग बाळाचं लग्न आलं कोण्या तिथी"

सुगंधी मसाला अगरबत्ती ऑर्डर करा 9637847936



आणखी एक गाणे :-

"जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
बापापाशी पुसू लागला, माझे लग्न कधी कराल सांगा मला.

जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
आईपाशी पुसू लागला, माझी वरमाय कधी होशील सांग मला.

जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
बहिणीपाशी पुसू लागला, माझी करवली कधी होशील सांग मला.

आपण या लेखात ज्या गाण्यांचा उल्लेख केला आहे ती गाणी कोणी लिहिली कधी लिहिली ह्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत मात्र गाणी अवीट गोडीची आहेत आणि आजही मनात जपून ठेवलेली आहेत, तर काही गाणी काळाच्या पडद्याआड गेली आहेत. माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत(पूर्वाश्रमीचे नाव) हिच्याकडच्या गाण्यांचा ठेवा मी येथे उल्लेखला आहे, तीचे खूप आभार. 



धन्यवाद.








वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...