Friday, April 16, 2021

देव-देवक/ग्रहमख (अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपलं सगळ्यांच मनःपूर्वक स्वागत. आपण आत्तापर्यंत वधुस कुंकू लावणे, साखरपुडा आणि गहू टिपणे ह्याबद्दल माहिती करून घेतली आहे. आपल्या लग्नसमारंभ ह्या लेखांना किंवा पोस्टना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, तुमच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून मिळत आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आपल्या ह्या पोस्ट (भारतात) सर्वात जास्त पुण्यात वाचल्या जातात तर भारताबाहेर अमेरिकेत वाचल्या जातात, कॅनडा, दुबई मध्ये देखील वाचकवर्ग आहे. मी आपल्या सर्व वाचकांना धन्यवाद देतो आणि आपल्या विषयाकडे येतो.

आज आपण "देव देवक" किंवा ग्रहमख ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. लग्नाला अगदी काही दिवस राहिले की देव देवता आणि ग्रहांचे पूजन केले जाते. शक्यतो देवक हे लग्न किंवा मुंजेच्या आधी समसंख्येने म्हणजे दोन, चार किंवा सहा दिवस ह्या प्रमाणे स्थापले जाते. एकदा देव देवक झाले की लग्नविधी मध्ये सोयर सुतक आले तरी त्याची अडचण होत नाही, पूढील कार्य निःसंकोचपणे पार पाडता येतात.

सकाळी घरातील देव-देवतांचा आशीर्वाद घेऊन वराकडून/वधुकडून घराच्या मुहूर्तमेढीची पूजा केली जाते.

या दिवशी नवग्रह पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, घाणा, जात्याचे पूजन, तसेच नंदिनीं देवतांचे पूजन, तसेच यज्ञ/हवन केले जाते. वधु/वर आई वडील आणि करवली यांच्या हस्ते हे कार्य पार पाडले जाते. 

ग्रहमखाच्या वेळी घरचा आहेर देण्याची प्रथा आहे. घरातील मंडळी म्हणजेच  वर किंवा वधूचे जवळचे नातेवाईक किंवा आईचे माहेरचे या वेळी पहिला आहेर देतात.  

आपल्याकडे आंब्याच्या वृक्षाला शुभकार्यात अढळ स्थान आहे, आंब्याच्या पानांच्या माळा, कलशावर आंब्याची पाने, तोरण तर ग्रहमखासाठी नंदिनी देवता तयार केल्या जातात, आंब्याच्या छोटया डहाळ्या घेऊन त्यास आंब्याचे पान गुंडाळून वर धागा बांधला जातो  अशा या सहा नंदिनीं देवतांचे पूजन करण्याचा प्रघात आहे शास्त्रानुसार त्यांना नांदीन्यादि मंडप देवता असे म्हणतात.. 

आपण जो दारापुढे मंडप घालतो त्यास पूर्वी ५ खांब असत चहूबाजूला ४ आणि १ खांब  मध्ये आधारस्तंभ असे एकूण ५  खांब  तसेच मंडपाच्या प्रवेशद्वारी १ खांब असे तो ६ वा खांब. ह्या सहा खांबांना ह्या देवता आवाहन आणि पूजन करून बांधल्या जात असत त्या पुढील प्रमाणे नंदिनी, नलिनी, मैत्रा, उमा, पशुवर्धिनी ह्या पाच मंडपात आणि मंडपाचे रक्षण करण्यासाठी सहावी मंडपाबाहेर शस्त्रगर्भा भगवती. हल्ली मंडपाची पूर्वीसारखी पावित्र्यता राखता येत नसल्या कारणाने त्यांस घरात  देवकाशेजारी सुपामध्ये पूजन करून स्थानापन्न केले जाते. 

नंदीनी देवतांचे पूजन


घाणा :- रोवळी (बांबू पासून बनवलेली उखळी) मध्ये दोन मुसळ ठेवली जातात दोन्ही मुसळांना एकत्र आंब्याच्या पानांची माळ घातली जाते. रोवळीमध्ये भात(साळी), उडीद, सुपारी, तांदूळ आणि हळकुंड घातले जातात आणि कांडले/कुटले जाते, वधु/वर आणि इतर ५ सुवासिनी मिळून ही रित करतात सोबतीला पारंपरिक गाणी असतातच. त्यास घाणा पाडणे/ भरणे असे म्हणतात.



पहिला घाणा घालू खंडिये भाताचा,
मंडपी गोताचा गणराज,

दुसरा घाणा घालू खंडिये गुलाल,
मंडपी दलाल गणराज,

तिसरा घाणा घालू खंडिये सुपारी,
मंडपी व्यापारी गणराज,

चौथा घाणा घालू खंडिये खारीक,
मंडपी बारीक गणराज,

पाचवा घाणा घालू खंडिये हळद,
मंडपी दळद गणराज.

तद्नंतर जात्यावर उडीद दळले जातात, जात्याला आंब्याच्या पानाची माळ घातली जाते, त्यात उडीद घालून वर/वधु आणि इतर स्त्रिया जात्यावर उडद्या मुहूर्त करतात. जात्यावर उडीद दळताना पारंपरिक गाणी गायली जातात.

जात्यानरे गणपती तुला तांदुळाचा घास,
वर/ वधू मोतीयाचा घोस.

जात्यानरे गणपती तुला सुपारी वाहिली,
वर/वधुस हळद लागली,

जात्यानरे गणपती तुला दूर्वाची जुडी,
अम्माघरी ग कार्य मोरया ग घाली उडी,

अशाप्रकारे आनंदात देवदेवक स्थापित केले जाते लग्न झाल्यानंतर त्याची उत्तरपूजा केली जाते. 

गाण्यांसाठी विशेष आभार:- माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत (पूर्वाश्रमीचे नाव), 
तसेच श्री प्रसाद तिवाड आणि श्री विजय पंडीत ह्यांचे खूप आभार.

धन्यवाद.

ऑर्डर साठी 9637847937 ह्या क्रमांकावर संपर्क करा











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


Friday, April 2, 2021

गहू टिपणे(अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः

नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपले सगळ्यांचे स्वागत, या लेखमालेतील हे तिसरे पुष्प आहे. आज आपण "गहू टिपणे" या प्रथेबद्दल माहिती करून घेणार आहोत. काही ठिकाणी यास भात हळदीचा मुहूर्त असे म्हंटले जाते मात्र अष्टागरात "गहू टीपणे" म्हणतात. मी वाचकांना आवाहन करतो की आपल्या या प्रथा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्धेशाने जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, फेसबुकवर शेअर करा जेणे करून आपल्या या रितिभाती सर्वश्रुत होतील.

साखरपुडा आटोपला की लगबग सुरू होते आमंत्रणांची, कुलस्वामिनी, ग्रामदेवता तसेच घरातील देवांना आमंत्रण पत्रिका देऊन झाली की बाकी आमंत्रणे केली जातात.  लग्नाला काही दिवस राहिले की गहू टिपण्याचा कार्यक्रम केला जातो, काही ठिकाणी आमंत्रणं सुरू करण्यपूर्वी सुद्धा हा कार्यक्रम शुभमुहूर्त म्हणून केला जातो.



वरपक्ष आणि वधुपक्ष दोन्ही ठिकाणी हा घरगुती कार्यक्रम केला जातो, वधूपक्ष आपल्या घरी आणि वरपक्ष आपल्या घरी (मुखत्वे स्त्रिया) हा कार्यक्रम पार पाडतात, ह्यासाठी शेजारील तसेच आळीतील स्त्रियांना खास आमंत्रण दिले जाते.

या दिवशी पहिली मुंडावळ बांधली जाते आणि शक्यतो जुनी मुंडावळ बांधण्याची प्रथा आहे. या कार्यक्रमात कोरे सूप घेऊन सुपास आंब्याच्या पानाची माळ बांधली जाते, त्यात गहू ठेवले जातात या गव्हांमध्ये पाच खडे, पाच खारका, पाच हळकुंड घातले जातात किंवा आपल्या प्रथेनुसार इतर गोष्टी घातल्या जातात, समई प्रज्वलित केली जाते. होणाऱ्या वधुचे किंवा वराचे औक्षण केले जाते, त्यानंतर ह्या सुपाभोवती स्त्रिया आणि वर किंवा वधु बसून गव्हांमघ्ये हात फिरवत पारंपारिक गाणी गातात. सोबत व्हीडिओ आहे तो नक्की पहा.

"सारवल्या भिंती, वर काढिले पोपट,
वधूचे/ वराचे नाव माझ्या ग बाळाच्या लग्नाची खटपट."

"सारवल्या भिंती वर काढिली ताम्हणं,
वधूचे/ वराचे नाव माझ्या ग बाळाच्या लग्नाची सामानं."

व्हीडिओ

केळवणासाठी लागणारी हळद खास वराकडून/ वधुकडून कुटून घेतली जाते. खलबत्त्याला गोल आंब्याच्या पानाची माळ बांधली जाते व त्यात हळद कुटली जाते. प्रथमतः वर/वधुकडून हळद कुटली की स्त्रिया उरलेली हळद कुटतात सोबत परंपरेने चालून आलेली गाणी गातात.

                                       व्हीडिओ

वराकडून मुहूर्तमणी आणि त्यात काळेमणी ओवून घेतले जातात. हा कार्यक्रम म्हणजे विवाहाची दिनांक जवळ आल्याची एकप्रकारे आठवणच आहे. हा कार्यक्रम अल्पउपहार करून संपन्न होतो.

पूर्वी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गहू, तांदूळ निवडले जात, पापड व इतर वाळवणं केली जात, लोणची मुरांबे करून लग्नासाठी लागणारी सर्व तयारी केली जाई.

"रात्री दळू गहू, दिवसा दळू पापडीच,
..........माझ्या ग बाळाचं लग्न आलं तातडीचं,"

"रात्री दळू गहू, दिवसा दळू पापड पिठी,
........माझ्या ग बाळाचं लग्न आलं कोण्या तिथी"

सुगंधी मसाला अगरबत्ती ऑर्डर करा 9637847936



आणखी एक गाणे :-

"जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
बापापाशी पुसू लागला, माझे लग्न कधी कराल सांगा मला.

जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
आईपाशी पुसू लागला, माझी वरमाय कधी होशील सांग मला.

जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
बहिणीपाशी पुसू लागला, माझी करवली कधी होशील सांग मला.

आपण या लेखात ज्या गाण्यांचा उल्लेख केला आहे ती गाणी कोणी लिहिली कधी लिहिली ह्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत मात्र गाणी अवीट गोडीची आहेत आणि आजही मनात जपून ठेवलेली आहेत, तर काही गाणी काळाच्या पडद्याआड गेली आहेत. माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत(पूर्वाश्रमीचे नाव) हिच्याकडच्या गाण्यांचा ठेवा मी येथे उल्लेखला आहे, तीचे खूप आभार. 



धन्यवाद.








वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Sunday, March 28, 2021

अष्टागरातील होळी

श्री गणेशाय नमः



नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आपल्या आजच्या पोस्ट मध्ये आपण अष्टागरातील होळीबद्दल जाणून घेऊयात. अष्टागर आणि परिसरात होळी फक्त एक दिवसाची नसते, तब्बल १५ दिवस आणि धुलीवंदन अशी १६ दिवस होळी साजरी केली जाते.

फाल्गुन शुद्ध पाडव्यापासून दररोज लहान होळी पेटवली जाते अर्थात लहान मुलं ही होळी साजरी करतात. संध्याकाळी घरोघरी जाऊन मुलं लाकडं हक्काने मागून आणतात. डब्बे, छोटे वाजवण्याचे साहित्य घेऊन वाजवत, गात, मौज करत मुलं आपल्या आळीत कुडी(लाकडं) मागत फिरतात.

"कुडी द्या कुडी मारीन उडी, कुडी नाही दिली तर होळी कशी पेटेल"

अशा आशयाची गाणी गात लहान मुलं घरोघरी फिरतात. हल्ली लहान मुलांना शाळेमुळे वेळ कमी मिळतो आणि ह्या गोष्टी करता येत नाहीत, पण अजूनही काही ठिकाणी मुलं ह्या गोष्टींचा आनंद लुटतात. पूर्वी होळी असली की "आट्या-पाट्या" हा खेळ खेळला जात असे आता मात्र हे खेळ खूप कमी (किंवा नाहीच) खेळले जातात.

लाकडं, पालापाचोळा, वाळलेले गवत एका झाडाच्या फांदीभोवती रचले जाते, या फांदीस सरा म्हणतात ही फांदी अगदी सरळ असते. पूर्ण झाड न तोडता फक्त फांदी तोडली जाते त्यामुळे वृक्षतोड होत नाही, भेंडीचा(भेंड वृक्ष) सरा शक्यतो लावला जातो, काही ठिकाणी सुपारी  किंवा गावातील प्रथा पद्धती नुसार सरा असतो हे झाड फुटीर वृक्ष असल्याने पुन्हा नव्याने त्याला फांद्या येतात. . होळीला अग्नी देऊन मुलं नाचतात, आनंदाने मोठ्याने "होळी पेटली रे" म्हणून एक सुरात आवाज देतात.

होळी पौर्णिमा आणि त्याच्या आदल्या दिवशी मोठी मंडळी होळीत सहभागी होत असतात. वर्गणी गोळा करून लाकडे खरेदी केली जातात काही मंडळी आपल्या कडे उपलब्ध असलेली लाकडे होळीस आनंदाने देतात. वृक्ष तोडून कोणी होळी साजरी करीत नाहीत वाळलेली जुनी लाकडे वापरून होळी साजरी केली जाते. मोठ्ठा सरा आणून त्याभोवती लाकडे रचून रांगोळी काढली जाते. होळीस हार साखरेची माळ घातली जाते. घरातील लहान मुलांना देखील साखरेची माळ किंवा साखरेचे दागिने घातले जातात.

आद्य अगरबत्ती सुगंधी लोबान


स्त्रिया होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळी, उकडीचे मोदक करतात. होळीची पूजा, औक्षण, नारळ अर्पण करून एखादे नाणे वाहिले जाते व नैवैद्य दाखवला जातो.

रात्री १२ वाजता किंवा मुहूर्तावर होळीस अग्नी दिला जातो. या प्रसंगी स्त्रीया पुरुष लहान मुले तसेच पहिला होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या पतीसोबत माहेरी आलेल्या नवविवाहित कन्या, अशी मोठी फौज होळीवर एकत्र येते.

अल्पउपहार केला जातो, तसेच होळीत वाहिलेले नारळ बाहेर काढले जातात प्रसाद म्हणून भाजलेले खोबरे खूप चविष्ट लागते. पुरुष मंडळी होळीशेजारी बसुन जागरण करतात.

दुसऱ्या दिवशी आनंदाने धुलीवंदन साजरे केले जाते, घरोघरी जाऊन शक्यतो नैसर्गिक रंग लावून होळी साजरी केली जाते, पूर्वी फुले आणि झाडांपासून रंग तयार केले जात असत हल्ली कालानुरूप त्यात बदल झाले आहेत. तसेच पूर्वी होळीच्या विस्तवावर अंघोळीचे पाणी तापवित असत त्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही असा समज होता. रात्री विस्तवावर चणे, वालाच्या शेंगा,उकडले जातात आणि मंडळी एकत्र येऊन त्याचा आस्वाद घेतात.




धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याकडे वर्षभर काही ना काही कामासाठी येणाऱ्या गडी मंडळींना किंवा घरकाम करणाऱ्या ताईंना आनंदाने पोस्त द्यायची पद्धत आहे, पोस्त म्हणजे पौशाच्या स्वरूपात दिली जाणारी छोटीशी भेट.



अष्टागरात सर्वच ठिकाणी अशाप्रकारे होळी साजरी केली जाते काही ठिकाणी थोडा फार बदल असला तरी मूळ प्रथा सारख्याच आहेत. तुम्हा सर्वांना होळीच्या खुप शुभेच्छा.

धन्यवाद.








वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Wednesday, March 17, 2021

अष्टागरातील साखरपुडा

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या शृंखलेच्या पुढच्या कडी मध्ये आपले सगळयांचे स्वागत. मागच्या भागात आपण "कुंकू लावणे" ह्या प्रथेबद्दल जाणून घेतलेत. आज आपण "वाङ्निश्चय" अर्थात साखरपुड्याबद्दल जाणून घेणार आहोत.

लग्न जमले आणि वधुस कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडला की वेध लागतात साखरपुड्याचे. बैठकीत किंवा कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात साखरपुड्याचा मुहूर्त पाहिला जातो, घरातील जाणती मंडळी पंचांग पाहून योग्य तो मुहूर्त काढतात किंवा गुरुजींना विचारून सवडीनुसार साखरपुडा ठरतो.

वधु आणि वरपक्ष दोन्ही कडे आनंदाचे आणि लगबगीचे वातावरण असते. शक्यतो साखरपुडा वधु पक्षाकडे असतो किंवा दोन्ही पक्ष सोयीनुसार ठिकाण ठरवतात. वधूपक्षाकडून किंवा ज्या पक्षाकडे कार्य असते त्या पक्षाकडून साखरपुड्याचे स्थळ, गुरुजी, भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था याची तजवीज केली जाते.

सगळ्यात आवडीचे म्हणजे दोन्हीही पक्षात खरेदी सुरू होते, वराचा पोशाख आणि अंगठी वधु पक्ष आणि वधूची साडी आणि अंगठी वरपक्ष खरेदी करतात. अर्थात वधू वराच्या आवडीनुसार खरेदी केली जाते. दोन्ही पक्ष एकमेकांशी संवाद साधून या सर्व गोष्टी करीत असतात, ह्यामध्ये दोन्ही पक्षातून प्रत्येकी एक व्यक्ती पुढाकार घेऊन संवाद साधतात किंवा लग्न जुळवून देणारी मध्यस्त व्यक्ती हे कार्य आनंदाने पार पाडत असते.

पाहुण्यांचे यथायोग्य स्वागत झाले की आपले आराध्य दैवत श्री गणेशाचे पूजन केले जाते वधु आणि वराचे आईवडील किंवा जवळचे नातेवाईक दांपत्य यजमानपद भूषवतात, गुरुजींच्या/ भटजींच्या उपस्थितीत सर्व कार्य केले जाते.







वरपक्षाकडून (वधूस पाटावर किंवा चौरंगावर बसवून) वधुची ओटी भरून साडीचोळी आणि सौंदर्य प्रसाधने दिली जातात तसेच पुष्पमाला घातली जाते. तसेच यथाशक्ती एखादा दागिना वधुस भेट दिला जातो. वरास देखील वधूपक्षाकडून पोशाख आणि यथायोग्य आहेर देवून सन्मान केला जातो तसेच पुष्पमाला घातली जाते. वधूचे तसेच वराचे पाच सुवासिनी औक्षण करतात. वधूची साखरपुड्यातील ओटी खास लग्नापर्यंत जपून ठेवली जाते.  

हिरव्या रंगाच्या साडीत वधु 


वधु वर दोघेही समोरच्या पक्षाकडून मिळालेला पेहेराव करतात, वधूची साडी शक्यतो हिरवी असते किंवा कुठल्याही शुभरंगाची असते. वधुवर एकमेकांना अंगठी घालून वाङ्निश्चय पार पाडतात तसेच एकमेकांना साखरपुडा दिला जातो.

वधु-वराच्या नातेवाईकांचा तसेच  करवलीचा दोन्ही पक्षांकडून मानपान केला जातो. सुवासिनीच्या ओट्या भरून त्यांचा सन्मान केला जातो. गजरा किंवा फुले दिली जातात. व्याही भेट होते तसेच इतर नातेवाईक उदा. वधू चे काका व वराचे काका एकमेकांस आलिंगन देऊन श्रीफळ देतात त्याच प्रमाणे स्त्रीवर्गात देखील एकमेकींना भेटण्याचा कार्यक्रम होतो. 

दोन्ही पक्षांकडून आणलेले पेढे एकत्र करुन पाहुण्यांना दिले जातात, तसेच आप्तस्वकीय व शेजाऱ्यांना वाटले जातात. आनंदाने स्नेहभोजन केले जाते वधुवरास उखाण्यात एकमेकांचे नाव घेण्याचा आग्रह नाही झाला तर नवलच.

लग्नाचा मुहूर्त, ठिकाण, वेळ याच वेळी निश्चित करण्यात येते. अशाप्रकारे आनंदात साखरपुडा संपन्न होतो.

पुढील भागात आपण "गहू टिपणे/ निवडणे" ह्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत.

धन्यवाद.

फोटो सौजन्य :- श्री अभिजित तिवाड व सौ अंकिता तिवाड.






वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Wednesday, March 3, 2021

कुंकू लावण्याची प्रथा(अष्टागरातील लग्नसमारंभ)

श्री गणेशाय नमः




 नमस्कार,

माझे नाव श्री अजित विनोद पंडीत तुम्ही जाणताच की मी अष्टागराबद्दल माहिती लिहितो. मी यापुढे अष्टागरातील लग्नसमारंभ ह्याबद्दल माहिती शृंखला सुरू करत आहे थोडक्यात येथे कशाप्रकारे विवाह सोहळे पार पाडले जातात त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत.

आपल्या भारत देशात किंवा आर्यावर्तात विवाह हा एक संस्कार मनला जातो. लग्न वधु वरांचे जरी असले तरी दोन कुटुंब यामुळे कायमची जोडली जातात.

अष्टागरात विवाह काही एकादिवसात पार पडत नाहीत तर या संस्काराच्या निमित्ताने अनेक सुंदर क्षण, प्रथा, रीतीभाती आणि वेगवेगळ्या प्रसंगांना गायली जाणारी पारंपरिक गाणी यांना आपण उजाळा देणार आहोत. आज सुरुवातीला आपण वधुस कुंकू लावण्याची प्रथा जाणून घेणार आहोत.

जेव्हा वधु आणि वर एकमेकांना पसंत करतात आणि दोन्हीही कुटुंब पुढे जायचा निर्णय घेतात तेव्हा बैठकीचा कार्यक्रम होतो. हि प्रथा सगळीकडे आहे, बैठक यशस्वी झाली की वाङ्निश्चय अर्थात साखरपुडा ठरवला जातो. बैठक आणि साखरपुडा या दोन कार्यक्रमामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम करण्याची प्रथा येथे आहे त्यास कुंकू लावणे असे म्हणतात.

प्रथेनुसार वधूला तिच्या होणाऱ्या सासरकडची मंडळी अर्थात स्त्रीवर्गातील वराची जवळची स्त्री म्हणजे आई, बहीण, आत्या किंवा वहिनी वधुस हळद कुंकू लावून खणा नारळाने ओटी भरते. वधुस साडीचोळी, सौंदर्य प्रसाधने या वेळी देण्याची पध्दत आहे. या वेळी पाटावर किंवा चौरंगावर होणाऱ्या वधुस बसवले जाते.



होणाऱ्या वरास देखील यावेळी साजेसा आहेर देऊन योग्यतो मानपान केला जातो. ठरलेल्या लग्नास एक मूर्तस्वरूप प्राप्त व्हावे या उद्धेशाने हा छोटेखानी कार्यक्रम केला जातो.  शक्यतो बैठकीच्या दिवशीच हा कार्यक्रम उरकून घेतला जातो किंवा दोन्ही पक्षांच्या सवडीनुसार कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडतो.

या वेळेस अल्पउपहार किंवा छोटेखानी स्नेहभोजन केले जाते, या प्रसंगी भटजी अथवा गुरुजींची आवश्यकता नसते. शक्यतो मुलीच्या घरीच दोन्ही कुटुंबे मिळून हा कार्यक्रम करतात.

आज आपण होणाऱ्या वधुस कुंकू लावणे ह्या प्रथेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलीत पुढे अशा अनेक रिति-भातींबद्दल माहिती घेऊ.

धन्यवाद.

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Thursday, February 18, 2021

अष्टागरातील खाद्यसंस्कृती

                                                                    श्री गणेशाय नमः  

 नमस्कार,

माझे नाव अजित विनोद पंडीत आहे, अष्टगरातील माहिती आपण माझ्या पोस्ट मध्ये वाचत असता. माझ्या या पोस्टमध्ये आपण अष्टगरातील खाद्य संस्कृती बद्दल महिती करून घेणार आहोत. आपल्या अष्टागरात अतिशय चविष्ट आणि सात्विक स्वयंपाक केला जातो. अतिशय साध्या पद्धतीचे पण रुचकर भोजन येथील पानात वाढले जाते. मी अष्टागरातील प्रत्येक अन्नपूर्णेस नमन करून आपल्या आजच्या विषयाकडे येतो.

अष्टागरात सर्वांना प्रिय आहे ते वालाचे बिरडे, काही मंडळी त्यास डाळिंब्या म्हणतात मात्र येथे बिरडे हाच शब्दप्रचार आहे. शेवगाच्या शेंगा (येथील बोलीभाषेत शेगटाच्या शेंगा) आणि बिरडे ही भाजी म्हणजे फक्कड बेत. येथे बिरड्यासोबत अनेक भाज्या असतात, अनेक रानभाज्यांना या बिरड्याने रुचकरपणा येतो. शेवगाची पाने आणि बिरडे ह्याची भाजी आणि आमटी खूप लोकप्रिय आहे. केळफूल, फणस, मोहाची फळे(मोट), माठाचे देठ तसेच शिराळा(दोडका), मेथी, दुधी, बटाटा, अळू, तेरी(पांढरे अळू), रानभाजी टाखळा, खापरा, शतावरी,  कुळी(कवाळी), शिंद(कोवळा बांबू, वास्ता) अगदी कारले सुद्धा बिरड्यात घातले जाते. या भाज्या भातासोबत छान लागतात, भात म्हणजे येथील मंडळींचा जीव की प्राण आहे.  येथील नैवेद्यामध्ये भातासोबत आवर्जून बिरड्याची भाजी हजेरी लावत असते.

शेवगाच्या शेंगा आणि बिरडे

येथील शेतीमध्ये पिकणारा लाल वाल येथे खूप आवडीने खाल्ला जातो. लाल वालाची उसळ तर खुपच आवडीची आहे, बटाटयासोबत देखील ह्या वालाची उत्तम भाजी केली जाते. आंबट वरण भात आणि वालाची भाजी म्हणजे अप्रतिम बेत.

येथे आमटीला आंबट वरण म्हणतात, वरणाचे अनेक प्रकार अष्टागरात प्रसिद्ध आहेत. चिंच थोडासा गूळ घालून तुरीच्या डाळीचे वरण केले जाते त्यास आंबट वरण म्हणतात. कच्ची कैरी, शेवगाच्या शेंगा, बटाटा, मुळा, वांगे देखील येथील वरणाला सांबर प्रमाणे चविष्ट बनवतात. डाळीला फोडणी देऊन फोडणीचे वरण केले जाते तर तुरीच्या डाळीच्या साध्या वरणास आम्ही गोडं वरण म्हणतो. खूप मसाले विविध प्रकारची वाटणे किंवा अतिशय कांदा लसूण न वापरता येथील स्वयंपाक केला जातो तेलाचा हातही थोडा आखडताच असतो. 

येथे पातळ भाज्यांना आमटी म्हंटले जाते वरणाला दुसरा पर्याय म्हणून ह्याकडे पाहिले जाते. अळूच्या पानाची आमटी येथे अतिशय लोकप्रिय आहे काही मंडळी त्यास फदफदं म्हणतात पण येथे तिला आमटीच म्हंटले जाते. थोडासा गुळ, खोबरे, चिंच, डाळ किंवा बिरडे, शेंगदाणे आणि काही मोजके मसाल्याचे पदार्थ घालून ही फक्कड आमटी केली जाते. येथील गृहिणीच्या हातची अळूची आमटी खाल्ल्यानंतर हात धुतला तरी त्या आमटीचा खमंग दर्प बराच वेळ हातावर राहतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला येथे रानभाजी शेवळी येते शेवळ्याची आमटी येथील बहुतांश मंडळींचा जीव की प्राण आहे. शिळी आमटी देखील खूप चविष्ट लागते.

शेगटाच्या पानाची आमटी, पालकाची आमटी आणि हो चिंचेचा सार येथे केला जातो, चिंचेच्या कोळात ओला नारळ, आणि काही मसाले घालून आमटी केली जाते त्यास चिंचेचा सार म्हणतात.

कटाची आमटी म्हणजे येथील बोली भाषेत आळणाची आमटी देखील आवडीने लोक खातात.

भाकरी, पोळ्या, घावन देखील स्वयंपाकघरात बनत असले तरी शक्यतो नाष्टा म्हणून खाल्ले जाते, पोळी सोबत बटाट्याच्या काचऱ्या(काप) येथे खूप प्रसिध्द आहेत. भाकरी सोबत पिठले, पातळ पिठले किंवा कोरडे पिठले खाल्ले जाते. चटणी घावन भाजी किंवा आमटी सोबत घावन पानात येतात. संक्रांतीला येथे खास आंबवलेले घावन केले जातात त्यास पोळा म्हणतात. अतिशय चविष्ट असतात हे पोळे. नाश्त्यासाठी आटवले(मऊभात) देखील केले जाते, नवीन तांदळाचे आटवले खूप चविष्ट असते, मऊभाताचा प्रकार कणेरी (कण्हेरी) खास आजारी माणसाला दिली जाते पचायला अतिशय हलकी असते. अन्न वाया घालवू नये या उद्देशाने उरलेल्या भाताचा फोडणीचा भात देखील येथे नाश्त्याला आवडीने खाल्ला जातो.

संक्रांतीमध्ये केले जाणारे पोळे

चटण्यामध्ये कच्च्या चिंचेची चटणी, कैरीची, ओल्या नारळाची चटणी, काही ठिकाणी शेंगदाण्याची लाल चटणी केली जाते. कैरीचे करंभट येथे आवडीने खाल्ले जाते, कैरीचे फोड त्यात तेल तिखट मीठ घालून तात्पुरते लोणचे केले जाते त्यास करंभट म्हणतात. कैरी किंवा कच्चा आंबा मिठाच्या पाण्यात किंवा मिठात खारवला जातो त्यास पाण्यातला आंबा म्हणतात जेवताना तोंडी लावायला उत्तम पर्याय आहे. येथील पानात कोशिंबिरी पण अधून मधून हजेरी लावत असतात.

उकडीचे मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या, गुळ पापडी, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, मुगाचे लाडू, खीर ही मिष्टान्न लोक आवडीने खातात, पुरणपोळी होळीत आवर्जून केली जाते. ओल्या नारळाच्या वड्या देखील येथील स्त्रिया सुरेख करतात त्यास नारळी पाक म्हणतात. पितृ पक्षात उंबर केले जातात गोड घारगे म्हणू शकतो त्यास, तांदळाची खीर देखील या पानात ठेवली जाते. येथे तिखट घारग्यांना वडे म्हणतात.

    
नारळी पाक

                                
अळूवडी, कवाळीचे(कुळीचे) मुटगे(मुडगे), कांदा भजी, बटाटा भजी आणि विविध प्रकारची भजी, देखील येथे प्रसिद्ध आहे.

अशा प्रकारे अनेक पद्धतीने आणि अनेक प्रकारची व्यंजने, खाद्यपदार्थ येथे तयार केले जातात. त्यातील फक्त काहींचा मी येथे उल्लेख केला आहे मात्र आणखी अनेक पदार्थ येथे स्वयंपाकात समाविष्ट असतात, त्याला उजाळा देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे, तुम्हाला आवडल्यास नक्की कंमेंट करा.

धन्यवाद,


पुढील लिंकवर क्लिक करून इतर पोस्ट वाचा. 










वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Sunday, November 22, 2020

अष्टागरातील शब्दप्रचार

 

श्री गणेशाय नमः

 


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण गेले अनेक दिवस आपल्या अष्टागर ब्राह्मण समाजाविषयी जाणून घेतोय. एव्हाना आपण खूप माहिती जाणून घेतली आहे, आपल्याकडे भारतात दर एक मैलावर भाषा बदलते त्यामुळे बोलीभाषा आणि त्यातील शब्द खूप वेगवेगळे आणि मजेशीर असतात. आलेवाडी गावाबद्दलच्या माझ्या पोस्ट मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे आपण अष्टागरात प्रसिद्ध असणारे काही शब्द, शब्द-प्रचार, म्हणी आज जाणून घेणार आहोत.

आपण जे शब्द पाहणार आहोत त्यातील बरेच शब्द, शब्द प्रचार ,म्हणी आता काळाच्या पडद्याआड दडले गेले आहेत. त्यांना उजाळा देण्याचा माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पालघर हे गुजरात राज्याच्या जवळ असल्या कारणाने काही गुजराती भाषेतील शब्द तसेच्या तसे किंवा थोड्याफार फरकाने आपल्या इथल्या भाषेत रुजले आहेत. तर काही शब्द येथील ब्राह्मणेतर समाजातील बोली भाषेतुन आले आहेत.

यातील काही शब्द, शब्द प्रचार, म्हणी खूप मजेशीर आहेत नक्की वाचा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय, प्रतिक्रिया मला लिहायला बळ देतात आणि त्यामुळे मी हे लेखन करतोय. तुमच्या कमेंट मुळे तुम्ही वाचताय तुम्हाला ते आवडतेय ह्याची पोच पावती मला मिळते.

सुरुवात करतोय कालगणनेशी संबंधित काही शब्दांपासून

·        पाख :- पक्ष

·        चांदणी पाख :- शुक्ल  पक्ष

·        काळोखी पाख :- कृष्ण पक्ष

·        भादवा :- भाद्रपद महिना

·        मगशीर, मक्षीर:- मार्गशीर्ष महिना  

·        घटका/घडका  :- घटिका, "घटकाभर बैस" अशा प्रकारचा शब्द प्रयोग

·        अख्खय :- नेहेमी किंवा अक्षय

आहेत ना मजेशीर शब्द? काही शब्द वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील,  पुढे  अन्न किंवा खाण्याशी संबंधित  काही  शब्द :-

·        पळसांडे :- पळीपडे, ह्या थोडा घट्ट रस्सा असलेली भाजीचा उल्लेख या शब्दाने केला जातो.

·        कठवळ/ कठोळ :- कडधान्य

·        आटवलं :- मऊ भात  

·        रोवळं :- तांदळाच्या रव्यापासून बनवलेला शिरा, मात्र हे रोवळं दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी फराळासोबत असतं.

·        पोळा / पोळे :- मकर संक्रातीला केले जाणारे विशेष प्रकारचे धिरडे (घावन/घावण) .

·        आंबोशी :- कच्ची कैरी कापून वाळवून मीठ लावून ठेवणे. (चिंचेप्रमाणे स्वयंपाकात वापर केला जातो)

·        डांगर :- हिरवा भोपळा

·        अनान :- सीताफळ किंवा सीताफळीचे झाड

·        मोरली  :- विळी

·        करंभट :- कैरीचे तिखट मीठ तेल घालून केलेले तात्पुरते लोणचे  (वाचताना तोंडाला पाणी आले ना?)

·        आळण :- कटाची आमटी किंवा पूरण पोळीच्या डाळीच्या पाण्यापासून तयार होणारी आमटी.

·        शेगट :- शेगवा / शेवगा

·        तूस :- भात किंवा साळीचे टरफल.

·        घट्टी :- मोठे दळणाचे जाते (जातं)

·        तेरी :- पांढरं अळू

·        कवाळी :- कुळी ची भाजी

·        आंबट वरण :- चिंच किंवा कोकम घालून केलेली डाळीची आमटी, येथे अष्टागरात आंबट वरण, गोडं वरण, फोडणीचे वरण खूप प्रसिद्ध आहे. 

·        कणेरी :- तांदूळ भाजून भरडून केली जाणारी पेज, आजारी माणसाला दिला जाणारा पदार्थ.

·        नारळी पाक :- ओल्या नारळाच्या वड्या.

·        कानवले / कानोले :- ओल्या नारळाच्या करंज्या

·        खापरा :- एक प्रकारची पावसाळ्यात येणारी रानभाजी

·        लोणा :- एक प्रकारची रानभाजी

·        शतावेल/ सतावेल :- शतावरीची पाने भाजी म्हणून येथे खाल्ली जाते  

 

खाण्याशी संबंधित शब्दांनंतर काहि वस्तू किंवा जवळपासच्या रोजच्या जागा याबद्दल पुढील शब्द :-

·        शेरी :- गल्ली, छोटा रस्ता

·        सुलुप :- छोटा किंवा मोठा पूल

·        सडक:- रस्ता

·        वई/ वय :- कुंपण (कंपाउंड) 

·        वाडा :- परस, अष्टागरात परस बागेला वाडा म्हणायची पद्धत आहे, यात फळझाडे, फुलझाडे, इतर औषधी झाडे, तुळशी वृंदावन, विहीर असे अनेक प्रकार आढळतात

·        खळे :- सारवून स्वच्छ केलेली जागा जेथे शेतातील भाताच्या पेंड्या ठेवल्या जातात त्यांना झोडपून भात वेगळे केले जाते ती जागा

·        बेडं : - गोठा

·        उडवं:- भाताच्या पेंड्या गोलाकार रचून ठेवल्या जातात किंचितसा मंदिराचा आकार असतो.

·        पारतेक :- प्राजक्त किंवा पारिजातक

·        रोज :-झेंडूचे फुल

·        कचरं :- गवत किंवा शेतातील तण

·        निमडा :- कडुनिंब

·        थेव :- निवडुंग (कॅक्टस)

·        टाकाबारी :- फडताळ, भिंतीतले लाकडी कपाट

·        हडपा :- चाके असणारी मोठी पेटी, पूर्वी यात वाण सामान देखील ठेवत  

·        मुजी :- नेहेमी पेक्षा थोडे मोठे मडके ज्यात वस्तू साठवल्या जात

·        झार :- मोट्ठे मडके ज्यात धान्य साठवले जाइ

·        ओटा / ओटी :- व्हरांडा

·        ओटली:- घरासमोर खास दिवाळीत लाल माती पासून बनवण्यात येणारी पायरी ज्यावर रांगोळी काढतात, हल्ली ह्या ओटल्या नामशेष झाल्या आहेत. 

·        कणा :- रांगोळी हो कणा हा शब्द कणा- रांगोळी असा हि वापरला जातो

·        उंतर :- उंबरठा

 

आणखी काही शब्द :-  

·        देव देवक :- ग्रहमख, लग्न मुंजी प्रसंगी काही दिवस आधी केले जाणारे देव देवतांचे पूजन

·        मेढ :- जुन्या घरामधील घराचा लाकडी आधारस्तंभ लग्नात किंवा शुभ कार्यात मुहूर्त मेढ पूजन केले जाते

·        गहू टिपणे :- लग्नाचा मुहूर्त करून हळद कुटली जाते व गहू तांदूळ निवडण्यास सुरुवात केली जाते, स्त्रिया गाणी गाऊन हा कार्यक्रम साजरा करतात , लग्नापूर्वी पहिली मुंडावळ ह्याच दिवशी बांधली जाते,

·        पारणेट :- वधूवस्त्र, लग्नात पिवळ्या रंगाची खास मामाने घेतलेली वधू साठीची साडी

·        कंड :- खाज येणे

·        लचांड :- नकारात्मक ऊर्जा किंवा शुक्लकाष्ठ मागे लागणे

·        बळणे :- भाजणे थोडा मजेशीर शब्द आहे हा खरेतर रागावून हा शब्द घेतला जातो "बळलं तुझं काम" किंवा "जळलं मेलं लक्षण" या उद्देशाने स्त्रिया हा शब्द वापरात असत पण मजेखातर.

·        पाटा फुटणे :- या शब्दाचा शब्दश: अर्थ न घेता लग्न होणे या साठी गमतीने वापरला जाणारा शब्द प्रचार

·        डोबा :- हा सुद्धा शब्द शक्यतो गमतीने घेतला जातो अर्थ आहे वयाने मोठा, मला असे वाटते कि हा मूळ गुजराती शब्द आहे  "केटलो डोबो थई गयो" असा शब्द गुजराती मध्ये वापरलेला माझ्या ऐकण्यात आहे.   

·        जऊळ :- मळभ

·        नाका वरची  माशी न उडणे :- एखादी व्यक्ती खुप अचपळ असणे 

·        वडा-पिंपळा खाली भेट न होणे :- कुठेच आणि मुळीच भेट न होणे

 

हल्ली फारसे कुणी हे शब्द वापरात आणत नसले तरी सुद्धा या अष्टागराशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक माणसाला ते हवे हवेसे आहेत. काहींनी पहिल्यांदा वाचले असतील त्यांना खुप गम्मत वाटत असेल, काहींनी खुप वर्षांपूर्वी हे शब्द ऐकले असतील ह्याचा वापर आपल्या भाषेत केला असेल तर कुणाचा सुवर्ण काळ त्यांना ह्या  शब्दांनी जागा झाला असे वाटत असेल. आपण कितीही नागरी भाषा व्यवहारात वापरली तरी आपल्या घरात बोलली जाणारी किंवा आपली जवळची भाषा बोलताना जो खरा आनंद मिळतो त्याला तोड नाही.

धन्यवाद.

वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...