Sunday, May 16, 2021

अष्टागरातील लग्नसमारंभातल्या रितिभाती

 श्री गणेशाय नमः


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत अष्टागरातील लग्नसमारंभ ह्या लेखमालेत मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. आत्तापर्यंतच्या आपल्या लेखमालिकेत आपण कुंकू लावण्याची प्रथा ते हळद लावण्याच्या प्रथेपर्यंत अनेक विवाह निगडित संस्कार, रितिभाती विधी ह्यांना उजाळा दिला आहे. आज आपण आपल्या अष्टागरात विवाह संस्कारात आणखी कुठल्या पद्धती पायंडे आहेत ते जाणून घेऊयात सोबत पारंपरिक गाणी असणार आहेतच.


आपला समाज हा मनुष्यप्रिय असून नातेसंबंध जपणारा आहे. आपल्या प्रत्येक कार्यात आपले नातेवाईक किंवा आप्त आपल्या सोबत रहावे या उद्देशाने काही प्रथा आहेत त्या आपण पाहुयात ह्यामुळे आपली नाती अधिक दृढ होतात.

लग्नात वर/वधूच्या मामास खूप महत्व आहे, सर्वप्रथम वर/वधुस मामा हाती कांकण बांधतो. वधुसाठी लागणारे वधूवस्त्र अर्थात पिवळ्या रंगाची साडी, आपल्याकडे अष्टागरात त्यास पारणेट म्हणतात हे नेसून वधु लग्नासाठी तयार होते ते मामाकडून असतं आणि चोळी(ब्लाऊज) वधुच्या मावशीने आणावी अशी पद्धत आहे. तसेच मामा वधुला बोहल्यावर उभी राहण्यासाठी घेऊन येतो. पुढील गाण्यांच्या ओळी बघा काय म्हणतायत.

"मामाचं पातळ मावशीची कांचोळी,
वधु (चे नाव) न ग बाई माझी गौरी हाराची पुतळी"

मामा वधुला घेऊन येताना


लग्नात करवलीस बहुमान आहे हे काही मी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. वधु/वरासोबत करवली प्रत्येक रितिभाती मध्ये अग्रस्थानी असते. वर/ वधूची बहीण करवली म्हणून लग्न मुंजीत आवर्जून लागतेच.

"मंडपाच्या दारी, करवल्या दहा वीस,
आणि करवली(चे नाव) बाई माझे मानाचे खाली बस"

"रुसली ग करवली, नाही येणार मांडवा,
करवली(चे नाव) न ग बाई माझी पायी धरिसी पांडवा".

जशी लग्नात करवली लागते तसेच "कानपिळी" या रितीसाठी वधूचा भाऊ उपस्थित असतो, माझ्या बहिणीचा योग्य सांभाळ करा असे सांगत प्रेमाने आणि गमतीने वराचा कान तो धरतो आणि नवरा मुलगा (वर) त्यास वचन देऊन योग्य तो आहेर या प्रसंगी देतो.

"कानपिळी"ची प्रथा

लग्नात जसा वर/वधूच्या बहिणीस बहूमान असतो तसाच जावयास देखील मान असतो अष्टागरात लहान बहिणीच्या लग्नात मोठ्या बहिणीच्या पतीस, सासरे बुवा आहेर करतात यथाशक्ती एखादी सोन्याची किंवा मौल्यवान वस्तू भेट म्हणून देतात तसेच आपल्या कन्येस व नातवंडासही योग्य तो आहेर देतात.

"बुंदीचे ग लाडू, जावयाच्या फराळाला,
एवढा ग अग्रमान, लेकीकारण जावयाला"

अशाप्रकारे आपल्या रिती भाती आपली माणसे जोडून ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणखी कुठल्या प्रथा आहेत ते पुढे पाहुयात.

अष्टागरात लग्न किंवा मुंज लागतेवेळी वधु आणि वराची आई(वरमाय) तेथे उपस्थित न राहता तुळशी समोर किंवा देवाजवळ हात जोडुन उभी असते.

लग्नमंडपास प्रवेशद्वार असतं त्यास दोन केळी बांधल्या जातात त्यास केळीचे खांब म्हणतात. ही केळीची झाडे केळीच्या घडाने लगडलेली असतात. ह्या केळी बांधताना सुवासिनी त्यांचे व या केळी आणणाऱ्या मंडळींचे औक्षण करतात.



केळीच्या खांबाचे प्रवेशद्वार

लग्नाच्या काही दिवस आधी कासाराला (बांगडया वाली स्त्री) आमंत्रित करून घरातील स्त्रिया आणि शेजारील तसेच आळीतील स्त्रियांना बांगड्या भरल्या जातात. वधुकडे वधुस हिरवा चुडा भरला जातो यात २१ बांगड्या असतात. बांगड्यावालीस पैसे आणि शिधा नारळ देण्याची प्रथा आहे. जेवणाची वेळ असल्यास भोजन करवूनच त्या बांगड्यावाल्या स्त्रिला निरोप दिला जातो.

वधुस मेंदी लावण्याचा कार्यक्रम सुद्धा छोटेखानी पद्धतीनं केला जातो, वरास देखील थोडीशी मेंदी लावली जाते.

हिरवा चुडा आणि मेंदी

अशा अनेक प्रथा परंपरांचे पालन करत आपल्याकडे लग्नसोहळा पार पाडला जातो, पुढील भागात आपण लग्नविधी बद्दल माहिती घेवूयात.

धन्यवाद.

गाण्यांसाठी विशेष आभार:- माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत (पूर्वाश्रमीचे नाव)











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Sunday, May 2, 2021

केळवण(अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः



नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ ह्या लेखमालेत आपलं सगळयांचे मनःपूर्वक स्वागत. दिवसेंदिवस आपली ही लेखमाला अधिक खुलत आहे आणि हळूहळू पुढे सरकत आहे. आज आपण वधुस/ वरास हळद लावण्याच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत त्यास केळवण असे म्हणतात.

आपण सगळेच जाणून आहात की हळद ही आरोग्यासाठी अतिशय लाभदायक अशी औषधी वनस्पती आहे, आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. लग्न म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात असते अनेक जबाबदाऱ्या ओघाने दोघांवर येत असतात त्यासाठी निरोगी असणे अती आवश्यक आहे, म्हणूनच आपल्या आर्यावर्तात/भारतात लग्नाआधी हळद लावली जाते हे काही मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

आपल्याकडे लग्नाआधी वर/वधुस हळद लावण्याची प्रथा आहे आणि या केळवणाच्या कार्यक्रमात हळदी सोबत केसाला शिरं म्हणजे नारळाचे दूध, सुगंधी तेल देखील लावले जाते, केळवण, तेलवण, ह्याबद्दल जाणून घेऊयात.

आदल्या दिवशीच (गहू टिपण्याचा वेळेस वर/वधु कडून कुटून घेतलेली) हळद त्यात चंदन भुकटी(पावडर) घालून रात्रभर भिजवली जाते. केळवणाच्या आधी ओल्या नारळाचे दूध शिरं तयार केले जाते. ह्या कार्यक्रमास स्रीवर्गास विशेषतः आमंत्रण असतं कारण हा कार्यक्रम सुद्धा मुख्यतः त्याच पार पाडत असतात.

केळवण करताना वर/वधु सोबत करवली आणि आई वडील ह्यांना पाटावर बसवून त्यांचे पाच सुवासिनी औक्षण करतात,  सुरुवातीला सुवासिनी आंब्याच्या पानाने वधुस/वरास हळद लावतात आणि ही हळद आधी पायाला, गुढगे हात अशाप्रकारचे वर चढवली जाते. वर/वधु पाठोपाठ करवली, आई वडील ह्यांना हळद लावली जाते मुहूर्ताची हळद लावून झाली की हाताने हळद लावली जाते सोबत पारंपारिक गाणी गायली जातात. वराची उष्टी हळद वधुसाठी पाठवली जाते. केळवण घरात किंवा मंडपात करण्याचा प्रघात आहे.




मंडपाच्या दारी हळदीचं वाळवण,
....माझ्या ग बाळाचे/बाईचे नवऱ्याचे/नावरीचे केळवण.

हळदी लाविल्या सारणी दंडीवाहे पाणी
तेवत्या मालिनी दाल देता,

बहू जाहले उशीर चिंते तुमचे दीर लक्ष्मण,
लक्ष्मणाचे धोतरे चंदन माखले, वाळत घातले नाग चाफे.

हळद लावून झाली की तेलवण केले जाते, डोक्याला शिरं आणि सुगंधी तेल लावले जाते. खायच्या पानाला तेल लावून ते डोक्यावर पडेल अशा पद्धतीने पाच सुवासिनी पान हाताळतात आणि गाणी गातात.

तेलवण 

चाफेलं धुपेलं मोगरेल तेल, 
त्या तेलवणासाठी चौघी सुवासिनी 
उभ्या देवापुढे लक्ष तेलवण पडे,

आधी पडे देवाला 
नंतर पडे मुहूर्तमेढी, 
नंतर पडे नवऱ्याला/ नवरीला.

अशोक वनामध्ये उभी 
सिता मंजुळ करूनी, तितक्यात आले मारुती,  
झाडावर चढोनी, चमत्कातर पाहुनी, टाकुनी मुद्रिका, 
सीता मनी दचकली.

त्यानंतर दोन उडदाचे पापड, एक पापड वधु/वराच्या हातात आणि दुसरा सुवासिनीच्या हातात घेऊन त्यात सुपारी एका पापडातून दुसऱ्या पापडात फिरवली जाते असे पाच सुवासिनी करतात. त्यावेळेस हे गाणे गायले जाते.

लोणं-मुणं भरली ताट ससूये घाट,
घाट जो रुंदला वेलाणीया आगर रुंदला,

विष्णुनावे हाताचे कांकण देऊ करा.
आणा हो चावी या उघडाहो पेटी या,
 काढाहो ठुशि या पेहेराव हाती,

या "अलका" बाई अलका बाई आत्या,
"विनोद" देव पिता "विद्या" बाई माता,
या दोघा तिघांचे पूर्व सोवाळे,
नवऱ्याला/ नवरीला तेल चढे.


ह्यानंतर वधु/वराची अंघोळ झाली की त्यांच्या पायावर कुंकवाने केळवे काढले जातात म्हणजेच कुंकू भिजवून  (पाणी किंवा तेलात) पायावर स्वस्तिक आणि मेंदी प्रमाणे नक्षी काढली जाते. या वेळी वधु/वराचा मामा हाताला कांकण बांधतो.

मामा मांडीपाट, मामी काढिते रांगोळी,
....माझ्या ग बाळाचे/बाईचे केळवण आजवेळी.

कुठल्याही शुभ कार्यात आपण देवाला विसरत नाही त्यामुळे ग्रामदेवता तसेच गावातील इतर देवतांना न विसरता वधु/वर मंदिरात आशीर्वादासाठी जाण्याची प्रथा आहे, सोबत घरातील तसेच आळीतील मंडळी आणि वाध्यवृंद असतो. मंदिराच्या कळसावर भगव्या रंगाचा बावटा(झेंडा) लावला जातो, वधु/वराच्या हस्ते देवाची यथासांग पूजा करून नारळ फोडला(वाढवला) जातो.


अष्टागर परिसर समुद्राच्या जवळ असल्या कारणाने येथिल कोळी, आगरी तसेच आणखी ब्राह्मणेतर समाज बांधव आपल्या आमंत्रणाला मान देऊन केळवणाच्या दिवशी/रात्री आवर्जून स्नेहभोजनासाठी उपस्थित असतात त्यांच्या संस्कृती मध्ये हळदीच्या कार्यक्रमाला खूप महत्व आहे.

वाजंत्री, नृत्य आणि भरपूर मौज करून केळवणाचा कार्यक्रम आनंदात साजरा केला जातो.

ऑर्डर करा 9637847937


लग्नाआधी म्हणजेच लग्नाला काही दिवस शिल्लक असताना जवळचे नातेवाईक वधुस/वरास केळवणासाठी आमंत्रित करण्याचा प्रघात आहे, यावेळी हळद न लावता फक्त पायावर केळवे काढून औक्षण केले जाते. स्नेहभोजन आणि भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता केली जाते. काही ठिकाणी ह्या केळवणाच्या वेळी हळद लावून मोठा कार्यक्रम केला जातो मात्र वधु/वरास इतर कामानिमित्त बाहेर फिरावे लागत असल्या कारणाने हळद लावणे शक्यतो टाळले जाते.

तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला ही लेखमाला कशी वाटते नक्की कळवा.

धन्यवाद.

पारंपरिक गाण्यांसाठी सौजन्य:- नेहेमी प्रमाणे माझी आत्या "श्रीमती जैमिनी वसंत पंडीत"

पुढील लिंकवर क्लिक करून इतर पोस्ट वाचा. 











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...