Friday, October 23, 2020

कुलस्वामिनी अष्टागराच्या

 श्री गणेशाय नमः 

नमस्कार मंडळी मी अजित विनोद पंडीत आपल्या आजच्या विशेष पोस्ट मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे सध्या नवरात्र सुरु आहे आणि कोरोनाच्या साथीमुळे शक्यतो आपल्याला बाहेर मंदिरात जाता येत नाही त्यामुळे आपल्या अष्टागारातील परिवारांच्या कुलस्वामिनी बद्दल आज आपण माहिती घेऊयात.

 

1)     श्री चंडिका देवी,

2)     श्री महालक्ष्मी देवी,

3)     श्री आशापुरा देवी,

4)     श्री वेडुबाई माता,

5)     श्री पिंपळा देवी,

6)     श्री पाटणा देवी,

7)     श्री रेणुका देवी,

8)     श्री मुजबा देवी,

9)     श्री महाजाई,

10)  श्री भवानी माता.

चला करूया दर्शन आपल्या कुलस्वामिनीचे.

 

श्री चंडिका देवी :- आलेवाडी येथील पंडीत कुटुंबाची कुलस्वामिनी श्री चंडिका देवी रत्नागिरीतील दापोली शेजारी दाभोळ येथे आहे, देवीचे कौलारू मंदिर हे आपण कोकणात आहोत ह्याची प्रचिती देते. देवीच्या मंदिर परिसरात एक गोड पाण्याचा झरा आहे ह्या पाण्यात पाय धुवून मंदिरात प्रवेश केला जातो. देवी मंदिराच्या आत एका शांत, खोल व थंड गुहेमध्ये विसावली आहे. राक्षस मर्दुन देवीने येथे विसावा घेतला आहे, देवीचे लोभस रूप समईच्या मंद प्रकाशात उजळून निघालेले आपण पाहू शकता, देवीला समईचा प्रकाश जास्त प्रिय असावा म्हणून आजही गाभाऱ्यात विजेचा दिवा टिकत नाही.

मंदिराच्या शेजारी पुरातन समाधी आढळते. मंदिर परिसरामध्ये शिवकालीन भुयार आहे. महाराज आणि मावळे त्याचा वापर करीत असत हल्ली मात्र हा भुयारी मार्ग बंद आहे.

मैसूर येथे श्री चंडिका देवीचे मूळ स्थान असून वसई जूचंद्र येथे देखील ही देवी छोटेखानी टेकडीवर विराजमान झाली आहे हे मंदिर पांडव कालीन असून हल्ली मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. श्री चंडिका, श्री महिषासुर मर्दिनी आणि श्री महाकाली अशा तिघी देवी येथे बसल्या आहेत. वसईचा किल्ला बांधतांना श्री चिमाजी अप्पा ह्यांनी येथील दगड वापरले होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

 

श्री चंडिका देवी

श्री चंडिका देवी , मंदिर 


श्री महालक्ष्मी देवी : - कोल्हापूरची अंबाबाई ही अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे अष्टागरातील अनेक कुटुंबांची ती कुलस्वामिनी आहे. फाटक, पंडीत, पाठक, जोशी, तिवाड, शहाणे,  ह्या कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. देवी बद्दल माहिती जग जाहीर आहे आपण देवीची थोडी वेगळी माहिती पाहुयात.

पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५.

तोच ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले.छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.

श्री महालक्ष्मी देवी

श्री महालक्ष्मी देवी, मंदिर


श्री महालक्ष्मी देवी मंदिर , पोखरण

श्री आशापुरी माता :- राणे कुटुंबाची कुलस्वामिनी आशापुरी माता सफाळे येथील एडवण गावात समुद्रात वसली आहे, समुद्रात एका छोटेखानी बेटावर /टेकडीवर सर्वोच्च ठिकाणी गुहेमध्ये देवी  विराजमान झाली आहे. देवीचे मंदिर देखील खूप सुंदर आहे. या टेकडीवर देवी सोबत काही वृक्ष आहेत त्यांना येथील बोली भाषेत राजणीचे वृक्ष म्हणतात. आता देवी पर्यंत जाण्यासाठी सिमेंटचा मार्ग असून येथे विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. राणे कुटुंबीय नेहेमी देवीच्या मंदिरासाठी सुखसोयी करण्यात तत्पर असतात. समुद्राला भरती असली की या टेकडी च्या चोहोबाजूने पाणी असते.

देवीचा डोंगर म्हणा किंवा टेकडी अतिशय नयन रम्य आहे मागील बाजूस खूप छान परिसर आहे समुद्राचे पाणी येथील दगड अतिशय फोटोजेनिक जागा आहे. काहींच्या म्हणण्यानुसार मागे एक पाण्याचा खड्डा किंवा खोल विहीर आहे त्याच्या खोलीचा थांग लागत नाही. अतिशय नयन रम्य ठिकाण आहे. येथील कोळी समुदाय ह्या देवीचे मनोभावे सर्व काही करीत असतात.

आपण थेट मंदिरापर्यंत आपल्या वाहनाने जाऊ शकता. सफाळे रेल्वे स्टेशन पासून एडवणला जायला सहा आसनी रिक्षा तसेच एस टी बसेस ची सोय आहे.

श्री आशापुरी देवी

 
श्री आशापुरी देवी, मंदिर

श्री वेडुबाई माता :- आलेवाडी चे नाईक कुटुंबाची ही कुलस्वामिनी असून आलेवाडी येथे हिचे मंदिर आहे. येथील श्री वेडुबाई मातेचे छोटेखानी मंदिर मनाला शांती देणारे असून देवी सोबत श्री परशुरामाची आणि श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे, देवीचे व्याघ्रवाहन आणि कूर्म देवीसमोर नतमस्तक झालेले आढळतात. नाईक कुटुंब मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतात तसेच नवरात्रौत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

नाईक कुटुंबाच्या कुलस्वामिनीचे मूळ स्थान उस्मानाबाद येरमाळा आहे. तेथूनच देवीची मूर्ती तसेच अखंड तेवणारा दीप मंदिर उभारणीच्या वेळेस आणले गेले होते.

येरमाळा येथे एका टेकडीवर किंवा छोटेखानी गडावर देवी विराजमान झाली आहे मंदिर परिसरात श्री दत्त, गणपती श्री दुर्गा ह्यांच्या मूर्ती आहेत टेकडीवर अनेक वृक्ष आहेत. येथील स्थानिक मंडळी येथे दरवर्षी चुना वेचण्यासाठी येतात.

देवीची गोष्ट :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात.

 

श्री वेडुबाई माता, आलेवाडी 

श्री येडेश्वरी माता ,येरमाळा 


श्री येडेश्वरी माता मंदिर, येरमाळा 

श्री पिंपळा देवी :- सरावली येथील जोशी कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे. साताऱ्या पासून अंदाजे 50  किलोमीटर वर औंध येथे देवीचे स्थान आहे.  श्री यमाई आणि तसेच श्री काळूबाई या नावाने देखील देवीला ओळखले जाते.  औंध येथे गडावर किल्ल्यामध्ये देवीचे मंदीर आहे.  देवीची मूर्ती काळ्या पाषाणात असून देेेेवी दोन मीटर ऊंच आहे, मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या हातात गदा, त्रिशूळ, धनुष्यबाण आणि पानपात्र आहे. मकर संक्रांतिला देविचा मोठा उत्सव असतो.

कोल्हापुरची अंबाबाई आणि श्री राम देविला "ये माई" अशा प्रकारे बोलवित असत त्यावरून देवीस यमाई हे नाव प्राप्त झाले आहे अशी आख्यायिका आहे.

सरावली च्या खैरा स्थित सौ. सुप्रिया सुशिल जोशी ह्यांनी देवीची माहिती आपल्या पर्यंत पोहचवली आहे मी त्यांचे आभार मानतो

श्री पाटणा देवी:- सरावली येथील रोडे कुटुंबाची कुलस्वामिनी श्री पाटणा देवी (चाळीसगाव) असून हे एक शक्तीपीठ आहे.

माता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारदमुनींच्या सूचनेवरुन माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वतःच्या शरिरातील प्राण काढून घेते त्यामुळे तिचे शव यज्ञ मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात आणि तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करु लागतात. त्यावेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णु सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करुन चंडिकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरुन खाली यावे अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवतीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान कर तेव्हा माझी स्वयंभु मुर्ती तुझ्या हातात येईल असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभु मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केली आहे.

पाटणादेवी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात.

श्री पाटणा देवी


श्री पाटणा देवी, मंदिर


श्री रेणुका देवी : - नगावे येथील पाटील/ जोशी , पंडित कुटुंबाची ही कुलस्वामिनी असून आपण सगळे देवीबद्दल जाणून आहात. नांदेड येथील माहूर येथे देवी विराजीत आहे.

देवीची आख्यायिका :- शिवाची पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.

श्री रेणुका देवी

श्री रेणुका देवी, मंदिर


श्री मुजबा देवी :- वेढी येथील पाध्ये कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी आहे. मांडा, सफाळे येथे देवीचे स्थान आहे. देवीचे मंदिर सुंदर असून समोर पुरातन विहीर आहे, मनशांती साठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. छायाचित्रांमध्ये आपण ते अनुभवू शकता.

देवीबद्दल :- देवीबद्दल :- कै केशवराव कुशाबा आचार्य ह्यांना श्री तुळजा भवानी देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि  "मांडा सफाळे येथे आसपासच्या टेकडीवर मी श्री मुजबा देवी या नावाने स्वयंभू प्रकट झाले आहे तू मला माझे स्थान बांधून दे" अशाच प्रकारचे स्वप्न गोसावी श्री सोमगिरी हे मांड्यात आले होते तेव्हा त्यांना पडले होते "तू मुंबईला जाऊन श्री केशवरावांना भेट आणि त्यांना इथे घेऊन ये"असे देवीचे सांगणे होते, गोसावी आणि श्री केशवराव तसेच त्यांचे बंधू श्री गणेश आचार्य ह्या सर्वांनी मांडे परिसरात येऊन बैलगाडीत स्वयंभू प्रकट मूर्ती घेतली आणि सफाळेच्या दिशेने प्रवास सुरु केला पुढे जात असताना गावाच्या वेशीवर गाडीचा बैल आज देवीचे मंदिर आहे तिथे बसून पडला हेच ते स्थान. ही जागा केशवरावांनी विकत घेऊन वैशाख शुद्ध पौर्णिमा शके १८१४ इसवी सन १८९२ रोजी देवीची स्थापना केली.

श्री मुजबा देवी, मांडा


श्री मुजबा देवी मंदिर, मांडा

श्री महाजाई :- वेढी येथील साठे कुटुंबीयांची ही कुलस्वामिनी असून आलेवाडी येथील एका नाईक कुटुंबाची देखील ही कुलस्वामिनी आहे. बोईसर पासून अंदाजे ७ किलोमीटर वर महागाव वसले आहे तेथेच श्री महाजाई देवीचे सुंदर स्थान आहे. देवीचे मंदिर एका छोटेखानी घराप्रमाणे आहे अतिशय सुंदर मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला अनेक वृक्ष आहेत परिसर अतिशय लोभस आहे एकूणच मन प्रसन्न करणारे हे पवित्र स्थान आहे.  

मंदिरामध्ये देवीच्या मूर्ती सोबत आणखी काही पुरातन मूर्ती आहेत. मंदिरासमोर तुळशीवृंदावन आहे. देवीचे देखणे रूप , छानदार नथ मन प्रसन्न करते. देवीसमोर संगमरवर दगडामध्ये कोरलेली देवीची पाऊले खूप रेखीव आहेत.

श्री महाजाई, महागाव

श्री महाजाई, मंदिर महागाव

श्री भवानी देवी :-  बहाड येथील काही मंडळी श्री भवानी देवीस आपली कुलस्वामिनी मानतात, देवी सर्वश्रुत आहे, देवीबद्दल माहीती पुढील प्रमाणे.

 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत.पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सागितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.

पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे.

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.

नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.


श्री भवानी माता

श्री भवानी माता, मंदिर


 सौजन्य :- नावरात्री बद्दल पोस्ट लिहावी हे मनात होते मात्र काही केल्या ते होत नव्हते आज वेढी येथील श्री प्रसाद तिवाड ह्यांनी आग्रह केला आणि खूप मदत देखील केली त्यामुळे मी आज ही पोस्ट करू शकलो तसेच सौ स्वप्नाली साठे, श्री प्रशांत सुधीर नाईक ह्यांनी देखील मदत केली आहे.









वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


Wednesday, October 21, 2020

अष्टागरातील पोखरण गाव

 


श्री गणेशाय नमः

                                                                                


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, आपण दर आठवड्याला भेटत असतो आणि नव-नवीन माहिती जाणून घेत असतो, आत्ता पर्यंत आपण बहाड पर्यंत पोहोचलो होतो ५ गावांची माहिती आपण प्रकाशीत केली असून आज आपण अष्टागरातील पोखरण बद्दल माहिती घेणार आहोत. आपण जर या आधी माझ्या पोस्ट वाचल्या नसतील तर या पोस्टच्या शेवटी मी प्रत्येक गावाचे नाव नाव लिहिले आहे त्यावर क्लीक करून आपण अष्टागरातील माहिती मिळवू शकता. 

कोरोनाच्या संकटामुळे मी व्यक्तिशः भेटून गावांची माहिती मिळवू शकत नाही त्यामुळे फोन, व्हाट्सअप, फेसबुक च्या माध्यमातून मी माहिती एकत्रित करीत असतो तसेच मला माहिती देणारे किंवा मी स्वतः देखील व्यवसायाने लेखक किंवा पत्रकार नाही त्यामुळे काही माहिती अनवधानाने राहून जाऊ शकते. आपल्या सर्व वाचकांना विनंती आहे की एखादी माहीती राहून गेली आसल्यास माझ्या ९६३७८४७९३७ ह्या क्रमांकावर व्हाट्सअप करावी. उल्लेखनिय माहिती असल्यास आपण नक्कीच त्या पोस्टमध्ये प्रकाशित करूच. ह्या ब्लॉगचा हेतू हाच आहे की अष्टागरातील माहिती मूर्तस्वरुपात कुठे तरी उपलब्ध असावी.  आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. चला आता अष्टागरातील पोखरण बद्दल माहिती घेऊया.  

पोखरण :- डहाणू तालुक्यातील हे अष्टागरातले दुसरे गाव, पोखरण म्हंटले कि चिंचेचे वृक्ष त्यांची शीतल छाया, येथील लाल वाल, ह्या गोष्टी मनात आल्या शिवाय राहत नाहीत.  पोखरण ची भौगोलिक परिस्थिती पाहता एका बाजूला वाणगाव रेल्वे स्थानक आहे तर दुसऱ्या बाजूला डहाणू रेल्वे स्थानक आहे. गावात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. गावाच्या दोन वेशीवर दोन देवी विराजमान आहेत पहिली ग्रामदेवता श्री पद्मावती माता तर दुसरी अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी.  

गावात ब्रह्मवृन्दाची तीन कुटुंबे आहेत जोशी, पंडित आणि राणे, जोशींचे गोत्र वसिष्ठ असून श्री महालक्ष्मी त्यांची कुलस्वामिनी आहे. पंडित कुटुंबाचे मैत्रेय गोत्र आहे आणि आई महालक्ष्मी कुलस्वामिनी आहे तर राणे कुटुंबीयांची कुलस्वामिनी श्री आशापुरी माता, एडवण असून गोत्र गार्ग्य आहे. श्री पद्मावती ही त्यांची ग्रामदेवता असून आई महालक्ष्मी आणि श्री कृष्ण त्यांचे आराध्य आहेत. गावातील व कामानिमित्त बाहेर असणारी ब्रम्हवृंदांची लोकसंख्या अंदाजे २१० आहे.

गावात पौरोहित्य केले जात असले तरी अनेक मंडळी शिक्षकी पेशात आहेत येथील पुरोहित पंचक्रोशीत तसेच मुंबई पर्यंत सर्वदूर पौरोहित्य करतात. काही मंडळी खाजगी नोकरी करीत असून काही व्यवसाय करतात. आणखी महत्वाचे म्हणजे पोखरणकर नेहेमी म्हणतात की क्रिकेट आमच्या रक्तात आहे.

येथील आशागड स्थित श्री संजीव शशिकांत जोशी ह्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले आहे त्यांनी एका दिवसात भारतीय राज्य घटनेवर सलग ४० व्याख्याने दिली आहेत आणि प्रत्येक व्याख्यान सलग ३० मिनिटांचे होते आणि महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे श्रोते असत व्याख्यानाचा एकही विषय पुन्हा घेतला नाही (नवीन व्याख्यान नवीन विषय). आपल्या ब्लॉग तर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो.  गेली अनेक वर्ष ते दैनिक राजतंत्र प्रकाशित करीत आहेत तसेच काही वर्ष त्यांनी डहाणू न्युज सुद्धा केबल टीव्ही वर सुरु केले होते. काही वर्ष त्यांनी कोचिंग क्लासेस देखील चालवलेत, त्यांचे विध्यार्थी चांगले गुण मिळवीत असा क्लासचा नावलौकिक होता. त्यांचे बंधू श्री शेखर शशीकांत जोशी हे व्यवसायाने वकील असून आयात निर्यात करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. दुसरे बंधु श्री राजेश जोशी हे त्यांचा बांधकाम व्यवसाय सांभाळतात. त्यांचे वडील श्री शशिकांत जोशी हे सर्कल अधिकारी होते आता सेवानिवृत्त आहेत. 

येथील कै. मोरेश्वर हरी जोशी हे मुख्य शिक्षक म्हणून काम करीत व परिसरातील सर्व शाळा त्यांच्या अखत्यारीत होत्या ताडियाळे येथील सरस्वती मंदिर शाळा उभारणीत त्यांचा देखील महत्वाचा वाटा आहे. विद्यालयाचा उल्लेख बहाडच्या पोस्ट मध्ये केल्यामुळे पुन्हा मी करत नाही मात्र पोखरण चा सुद्धा ह्या विद्यालयाच्या उभारणीमध्ये वाटा आहे. पोखरण येथील शिक्षकांविषयी मी माझ्या भविष्यातील पोस्ट मध्ये लिहिणार असल्यामुळे येथे सर्वच शिक्षकांचा उल्लेख करत नाहीये.

येथील चंडिगावस्थित डॉ.  श्री नरेंद्र विश्वनाथ जोशी गेली अनेक वर्ष पंचक्रोशीत वैद्यकीय सेवा देत आहेत तर त्याचे सुपुत्र डॉक्टर श्री नैनेश नरेंद्र जोशी बोईसर येथे  फिजिओथेरपिस्ट आहेत. 

 ब्लॉग च्या मर्यादेमुळे सर्वांचीच नावे नमूद करता येत नसली तरी काही उल्लेखनीय नावे, श्री अनिल सखाराम जोशी - प्रांत अधिकारी त्यांच्या विषयी खास आठवण म्हणजे ते आपल्या कार्यालयात जाण्यासाठी सरकारी गाडी न वापरता सार्वजनिक वाहनातून प्रवास करीत., श्री त्र्यंबक मोरेश्वर जोशी - ग्राम विस्तार अधिकारी, श्री अरुण डी जोशी - कृषी अधिकारी, श्री वसंत जोशी उच्च तलाठी अधिकारी , येथील श्री विठ्ठल जोशी ह्यांनी मा. आमदार श्री कृष्णा घोडा ह्यांचे पी. ए. म्हणून अनेक वर्ष कार्यभार सांभाळला आहे तसेच ते राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित आहेत. श्री प्रदीप जोशी हे डहाणू नागरपालिके मध्ये उपमुख्य अधिकारी आहेत. श्री किरण जोशी हे स्वतःचे वधुवर सूचक मंडळ चालवतात व अदानी थर्मल पॉवर प्लांट येथे उच्चपदस्थ असून त्यांना त्यांच्या कार्यासाठी कंपनीने सुवर्ण पदक आणि अनेक पुरस्कार दिले आहेत. श्री अजय जोशी ह्यांचे देखील स्वतःचे वधुवर सूचक मंडळ आहे. येथील श्री शरद पंडित हे सोळशेत आदिवासी भागात आदिवासींना धान्य वाटपाचे कार्य करतात येथे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान चालवतात. तसेच कै.श्री विष्णुपंत जोशी हे मुंबई महानगर पालिकेत अधिकारी होते. मराठी माणूस शक्यतो व्यवसाय करीत नाही मात्र येथील श्री कमळाकर राणे ह्यांचा वाण सामान (किराणा) विक्रीचा व्यवसाय आहे. 

पोखरण आणि येथील श्री कृष्णजन्मोत्सव एक अतूट नाते आहे. गेली ७५ पेक्षा जास्त वर्षे येथे श्री कृष्णजन्मोत्सव साजरा केला जातो आठ दिवस आधीपासून येथे देवाचे अनुष्ठान केले जाते या वेळी येथील वातावरण खूप भक्तिमय असते, नवसाला पावणारा कृष्ण म्हणून ह्या गादीची पंचक्रोशीत ख्याती आहे. अनेक मंडळींना खूप छान अनुभव आले आहेत. श्रीमती उज्वला जोशी आणि कै. दामोदर रामचंद्र जोशी यांच्या ओटीवर हे पवित्र अनुष्ठान केले जाते.

श्री कृष्ण जन्माष्टमी, पोखरण

पोखरण ची आणखी एक ख्याती म्हणजे येथे आयोजित केले जाणारे खास पोखरण करांचे स्नेह-संमेलन किंवा gate together. शक्यतो दरवर्षी १ मे किंवा ५ मे ह्या दिवशी हे संमेलन आयोजित केले जाते देवी श्री महालक्ष्मीला अभिषेक, स्त्रियांसाठी हळदी कुंकू, जेष्ठनागरिकांचे सन्मान, विशेष कार्य करणाऱ्या मंडळींचे, गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव देखील केले जातात तसेच सामूहिक मिष्ठान्न भोजन असते. गावातल्या लेकींना आपल्या कुटुंबासमवेत येथे खास आमंत्रण असते. एकूणच खूप आनंदात आणि दिमाखात दोन दिवसांचा सोहळा पार पाडला जातो अर्थातच याचे श्रेय सर्व ब्रह्मवृंद आणि सदस्यांना जाते. आणखी महत्वाचे म्हणजे गावातील देवींचे उत्सव देखील आनंदाने मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेत पार पाडले जातात.   

श्री महालक्ष्मी, पोखरण 

येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चैत्र अष्टमी आणि नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेने पार पडतात. या वेळी भक्तांची मोठी गर्दी असते विशेषतः चैत्र अष्टमीच्या हवनाला मोठी गर्दी असते.

धन्यवाद.


वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


सौजन्य :- ही पोस्ट लिहिण्यासाठी श्री किरण जोशी ह्यांनी खूप माहिती दिली असून श्री वैभव जोशी ह्यांनी देखील महत्वाची माहिती दिली आहे, श्री अभिजित तिवाड ह्यांचा देखील हातभार लागला.




Wednesday, October 14, 2020

अष्टागरातील बहाड गाव

श्री गणेशाय नमः


नमस्कार मी अजित विनोद पंडित, आता मला माझी वेगळी ओळख द्यायची आवश्यकता नाही मात्र नवीन वाचकांसाठी मी माझे नाव नमूद करतो. तुम्हाला सगळ्यांना अष्टागराविषयी माहिती देताना खूप काही गोष्टी मला सुद्धा नव्याने माहिती होत आहेत, नवीन ओळखी होत आहेत, आपल्या अष्टागरातील टॅलेंट बाहेर येतय खूप आनंद होतोय. मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचे आहे कि आपल्या अष्टागराविषयी माहिती कुठेच लिखित स्वरूपात नाही त्यामुळे मला संपूर्ण माहिती मिळू शकत नाही माहिती देणारे देखील काही प्रशिक्षित नाहीत त्यांना जसे जेवढे शक्य असेल त्याप्रमाणे मला ते मदत करत असतात. त्यांच्या किंवा माझ्या अनावधानाने काही गोष्टी नमूद करायच्या राहिल्या तर आपण सांभाळून घ्यावे. एखादी माहिती राहून गेल्यास हक्काने माझ्या व्हाट्सअप क्रमांकावर द्यावी.

बहाड :- आज आपण अष्टागरातील बहाड गावाविषयी जाणून घेणार आहोत. अष्टागरातील बहाड आणि पोखरण ही दोन्ही गावे म्हणजे जणू जुळी भावंडंच. पूर्वी या परिसराला बाडापोखरण म्हणून संबोधत, आजही काही घरांवर तशी नोंद दिसते. बोईसर डहाणू रस्त्यावर बहाड गाव वसले आहे श्री हनुमानाचे दर्शन झाले की पुढे जाताच ब्रह्मवृदांची घरे सुरु होतात. माझ्यासाठी बहाडची खास आठवण म्हणजे येथे पिकणारा लाल वाल. असा चविष्ट वाल इतरत्र मिळणे अशक्यच. आपल्या अष्टागरात वालाचे बिरडे सुप्रसिद्ध आहे हे काही वेगळे सांगायची आवश्यकता नाही. अष्टागरातील क्वचितच एखादी अन्नपूर्णा गृहिणी असेल की जिने वालाचे बिरडे केले नाही.  येथील ब्राह्मणाची लोकसंख्या अंदाजे ४७ तर परगावी असणारे १२० असावे. पाठक या कुटुंबाचे गोत्र सांख्यायन असून कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी आहे, काही मंडळी श्री भवानी मातेला देखील आपली कुलस्वामिनी मानतात. 

बहाड येथील हनुमान जयंती उत्सव खुप लोकप्रिय असून, गणेशोत्सव खास असतो, गोकुळ अष्टमी देखील अतिशय आनंदाने साजरी केली जाते. होळी हा सण देखील अतिशय हौसेने साजरा केला जातो.

हनुमान मंदिर, बहाड

श्री मारुती, बहाड 

आपल्या अष्टागरातील इतर गावांप्रमाणे बहाडही आपले वैशिष्टय जपून आहे कारण आहे इथली माणसे. सुरुवातीला मी कै. गिरीश पाठक यांच्या विषयी बोलणार आहे. त्यांनी आपल्या वाडी मध्ये ४०० नारळीच्या झाडांची लागवड केली आहे आणि त्यासाठी २००५ साली महाराष्ट्र शासनाचा कृषी पुरस्कार त्याना मिळाला होता पंचक्रोशीत इतक्या मोठ्या प्रमाणावर नारळीची लागवड करणारे ते बहुदा पहिलेच. त्यांनी बरीच लोकाभिमुख कार्ये देखील केली आहेत गावात पिण्याचे पाणी आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती संगीता गिरीश पाठक ह्या योग, प्राणायाम तसेच मेडिटेशनचे वर्ग चालवतात.

बहाड चे पालघर स्थित श्रीयुत अतुल पाठक हे पालघर नागरपालिकेमध्ये तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत यावरून त्यांच्या कार्याचा अंदाज आपल्याला आलाच असेल.  त्यांनी परिसरात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत.

काही उल्लेखनीय नावे :- येथील श्री शिरीष पाठक राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्यालयात ४० वर्षे सेवा देत आहेत, येथील ओंकार उल्हास पाठक हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात असून कामानिमित्त परदेशात वास्तव्यास आहेत. येथील श्री भूषण पाठक आणि प्रशांत पाठक हे गेली ३० वर्षे डायमेकिंगच्या व्यवसायात आहेत.  येथील श्री चारुदत्त निवास पाठक ह्यांनी शेतकी क्षेत्रात पदवी घेतली असून आधुनिक पद्धतीने शेती करतात. येथील चारकोप कांदिवली स्थित श्री सुबोध नरहरी पाठक हे व्यवसायाने वकील आहेत ते सर्व क्रिमिनल कोर्टात वकिली करतात तसेच हाय कोर्टात नेहेमीच कार्यरत असून सुप्रीम कोर्टात देखील कार्यरत आहेत. येथील पुणेस्थित श्री अरुण पाठक पुण्यात योगगुरू म्हणून प्रसिद्ध आहेत तर त्यांचे बंधू श्री कांचन पाठक हे बँकेत ब्रांच मॅनेजर होते हल्ली सेवानिवृत्त आहेत. येथील श्री हिमांशू दीपक पाठक हे एन एल पी कोचिंग आणि काउंसिलिंग करतात, मुलांच्या बुद्धिमत्तेसंदर्भात अतिशय महत्वाचे काम करतात. 

येथे गावात मुख्यतः पौरोहित्य केले जाते, काही खाजगी व सरकारी नोकरी करतात तसेच काही मंडळी पेश्याने शिक्षक आहेत, काही मंडळी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत. 

येथील लेकी सुना पुढील कामात पारंगत आहेत जसे की गरीब आणि होतकरू विध्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिकवणी घेणे, काही इंजिनीअर आहेत, काही शिक्षिका आहेत, काही उच्चशिक्षण घेत आहेत. 


सरस्वती विद्यामंदिर - बाडापोखरण 
काही जुन्या आठवणी :- येथील श्री अशोक विनायक पाठक ह्यांचा गावात विद्यालय (हायस्कुल) स्थापन करण्यात मोलाचा वाटा आहे. ही गोष्ट आहे १९६५-६६  ह्या वर्षातली, मुळचे कोकणातले डॉक्टर जोशी ह्यांनी श्री अशोक विनायक पाठक ह्यांच्यासमोर गावात ८ वी पासून पुढे शाळा नसल्याकारणाने आपण शाळा सुरु करू असा प्रस्ताव मांडला, त्यांना तो आवडला तसेच कै. हरिभाऊ पाठक यांनी कल्पना उचलून धरली ते जिल्हा परिषदेत हेडमास्तर म्हणून कार्यरत होते. सर्वानुमते बहाड येथील हनुमान मंदिरात सर्वप्रथम ८ वी चा वर्ग सुरु झाला. आणि शिक्षक म्हणून अशोकजी ह्यांनी श्री गणेशा केला सोबत श्री मोरेश्वर जोशी हे आणखी एक शिक्षक होते. अशा प्रकारे शाळा सुरु झाली पुढे शेजारील तडियाळे गावात शाळेला जागा मिळाली "सरस्वती विद्या मंदिर-बाडा पोखरण " या नावाने आजही हायस्कुल सुरु आहे. श्री अशोकजी यांनी शाळेची मुहूर्तमेढ रोवून पुढे वरळी डेरी येथील सरकारी नोकरी स्वीकारली क्लास -२ ऑफिसर म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत . ही गोष्ट संक्षिप्त आहे मी पुढे माझ्या भविष्यातील पोस्ट मध्ये तपशीलात माहिती लिहेनच .

शाळेचा विषय चालू आहे आणि कै. श्री मार्तंड नारायण पाठक ह्यांचे नाव कसे मागे असेल, गावात प्राथमिक शाळा सुरु करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे सरकार दरबारी पाठपुरावा करून त्यांनी बहाड येथे शाळा सुरु केली, त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत गावात सरकारी दवाखाना आणण्याचे महत्वाचे काम त्यांच्या हातून घडले आहे त्याची साक्ष आजही दवाखान्यातील त्यांच्या नावाची शिळा देत आहे. गावात शेतकी सोसायटी त्यांच्याच प्रयत्नातून सुरु झाली सोसायटीच्या चेअरमन पदी देखील ते विराजमान होते, इतक्यात ते थांबले नाहीत तर गावाचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच पदी ते विराजित होते ते ही तब्बल १६ वर्ष . पंचक्रोशीत त्यांना बहुमान होता. 

येथील कै. जगन्नाथ पाठक हे मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी नोकरीत होते मुंबईतला मोठा परिसर ते सांभाळीत असत. त्यांनी १२ वर्ष कुष्ठरोग्यांसाठी काम केले आहे ते ही सेवा निवृत्ती नंतर, एका जर्मन संस्थेसोबत ते बोरिवली (कुष्ठरोग्यांसाठी नॅशनल पार्क येथे कॅम्प होता) येथे काम करीत. डोंबिवली ते बोरिवली रोज लोकल प्रवास करून त्यांनी ही समाजसेवा केली होती पुढे पालघर येथे ते वास्तव्यास होते त्यावेळी पालघर ते बोरीवली असा देखील प्रवास काहीवर्ष केला. नुकतेच त्यांचे अल्पशः आजाराने निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

बहाडला कलेचा वारसा देखील लाभला आहे येथील श्री प्रवीण पाठक हे उत्तम गायक असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत गेली अनेक वर्ष ते सुमधुर गाण्यांचे कार्यक्रम करतात. माता सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेले श्रीयुत प्रवीण पाठक खूप छान गातात मी त्यांचे गाणे बरेचदा ऐकले आहे कार्यक्रमात त्यांच्या गाण्याला खूप छान दाद मिळत असते.

मेघना एरंडे
कला क्षेत्रातील पुढील नाव म्हणजे मेघना एरंडे-जोशी, बहाडच्या कन्या उषा अनंत पाठक(पूर्वाश्रमीचे नाव) ह्यांच्या त्या कन्या आहेत. आज मेघनाजींना कोण ओळखत नाही गेली ३० वर्ष त्या टेलिव्हिजन, हिंदी मराठी चित्रपट, मालिका, नाटक, जाहिरात, अँकरिंग या अनेक क्षेत्रात अभिनेत्री म्हणून प्रशिध्द आहेतच सोबत त्या खूप मोठ्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. अनेक लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी कामे केली आहेत तर लहान मुलांची आवडती बरीच कार्टून्स  त्यांच्या आवाजात डब (सादर) झाली आहेत , तरुण वर्गाचे आवडते नेटफ्लिक्स वरील खूप फॉरेन लँग्वेज चे कार्यक्रम चित्रपट त्यांच्या आवाजात डब झाले आहेत. त्याचे काम खूप चॅलेंजिंग असून खूप अभ्यास करावा लागतो त्यांची खासियत म्हणजे लहान मुलांच्या आवाजाची नक्कल त्या इतक्या हुबेहूब करतात कि त्याला तोडच नाही.  काही युनिव्हर्सिटीज त्यांना विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा आमंत्रित करतात. ही त्यांची माहिती खूप संक्षिप्त स्वरूपाची आहे, मी त्यांच्या काही मुलाखती पहिल्या आहेत त्यांच्या बद्दल खूप लिहिण्या सारखे आहे एक पोस्ट मी खास त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी करेन.

त्यांनी केलेले अभिनय आणि दिलेले आवाज पुढील प्रमाणे मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, सनई चौघडे, झेंडा, टाइम पास, दिल दिमाग बत्ती, हिंदीत इंग्लिश बाबू देसी मेम , कसं 'तेरी कसं, दीदी, एक अजून, रज्जो. डबिंग :- हॉलिवूड चित्रपट:-  इंडिपेंडंस डे, ट्विस्टर थे लॉस्ट वर्ल्ड, हॅरी पॉटर, ट्विलाईट बोन, अजून खूप सारे, कार्टून्स:- नॉडी, निन्जा हातोडी, पेप्पा पिग, बॉब दी  बिल्डर आणखी खूप आहेत.


अभिनय क्षेत्रातील आणखी मोठे नाव म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर बहाडच्या कन्या लता कृष्णाजी पाठक (पूर्वाश्रमीचे नाव) ह्यांचे सुपुत्र. आपण सगळेच त्याना ओळखतो मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये मोठा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून त्यांचे नाव आहे. त्यांचा अभिनय, शरीरयष्टी आणि आवाज त्यांच्या अभिनयाला सोनेरी किनार आणतात. त्यांच्या आवाजाची विशिष्ट शैली त्यांची एक प्रकारे वेगळी ओळख आहे. आपल्या फॅन सोबत कसे वागावे आणि ट्रोलर (टीकाकार) ला कसे हाताळावे हे ह्यांच्या कडून शिकावे. चित्रपट, मालिका , नाटक, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात ते वावरतात. ह्या गोजिरवाण्या घरात तसेच दामिनी या मालिकांपासून ते मराठी घराघरात प्रसिद्ध झाले, किमयागार, भूमिका, वादळवाट आणखी लिस्ट मोठी आहे तसेच चित्रपट ब्लाइंड गेम, मोरया, पिकनिक, आनंदाचे झाड, सनई चौघडे, शहाणपण देगा देवा, मुंबई मेरी जान अशाप्रकारे त्यांनी खूप काम करून ठेवले आहे त्यांनी केलेल्या अभिनयाची ही काही मोजकी उदाहरणे आहेत अष्टागरातील प्रत्येक माणसाला आज अभिमान आहे कि कला क्षेत्रातिल दोन दिग्गज इथल्या मातीशी नाते सांगतात.  त्यांच्यावर देखील मी एक स्वतंत्र पोस्ट लिहिणार आहे.

संतोष  जुवेकर आपल्या आईसोबत 

सौजन्य :- ही पोस्ट लिहिण्यासाठी मला अनेकांनी मदत केली आहे त्यातील काही नावे कु.अनिकेत अविनाश पंडित,  श्री प्रशांत अनंत पाठक, श्री प्रकाश पांडे, श्री अतुल पाठक.

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

पारंपारिक पेहेरावासाठी माझी बहीण सौ अंकिता पंडीत-तिवाड हिच्या "शुभवस्त्रं" ला ह्या लिंक वर क्लिक करून भेट द्या आवडल्यास ऑर्डर करा 






Wednesday, October 7, 2020

अष्टागरातील सरावली गाव

 श्री गणेशाय नम:


नमस्कार, मी अजित विनोद पंडित आपण एव्हाना मला ओळखू लागला आहातच आणि माझ्या पोस्टची आतुरतेने वाट पाहता, आपल्याला कुतूहल असते कि येत्या आठवड्यात नवीन काय वाचायला मिळेल, हे कुतूहल ही उत्सुकता  खूप आनंददायी आहे. आपल्या ब्लॉगची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे आणि आपण सगळेच त्याचे वाटेकरी आहात.

आपल्याकडून खूप छान आणि वेगवेगळया कमेंट येत आहेत काही कौतुकाच्या, काही माहिती देणाऱ्या तर काही नवीन सुचवणाऱ्या, सगळयांचे मी आभार मानतो. या ब्लॉगच्या माध्यमातून मी अष्टागर उलगडण्याचा प्रयत्न करतोय, काही गोष्टी मनाशी ठरवून एक स्वरूप  तयार केले आहे त्यानुसार मी पोस्ट लिहीत असतो, या कारणाने सगळे विषय येथे नमूद करता येत नाही  ब्लॉग च्या मर्यादेनुसार मला पोस्टची लांबी ठेवावी लागते. हल्ली वेळेला खूप महत्व आहे त्यामुळे पोस्ट जास्त लांबवत नाही जेणेकरून सगळेच ती वाचू शकतील. तरी देखील कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय.

अष्टागराची एक खासियत सांगतो, येथील प्रत्येकाचे आठही गावांशी ऋणानुबंध आहेत प्रत्येकाच्या गोड आठवणी या गावांमध्ये आहेत. अष्टागर हे एक घर आहे त्यामुळे "अष्टाघर" असाही आपण उच्चार करू शकता. मजेशीर गोष्ट म्हणजे विवाह प्रसंगात जर दोन्ही पक्ष अष्टागरातले असले तर दोन्ही पक्षांचे ९०% पाहुणे सामायिक (कॉमन) असतात आहे कि नाही गम्मत. आपण आत्तापर्यन्त अष्टागरातील तीन गावे पाहिलीत बरीच माहिती आपण पोस्ट केली आहे आज आपण सरावली या गावाविषयी जाणून घेणार आहोत.   

सरावली :- बोईसर च्या खांद्याला खांदा लावून बोईसर पालघर रस्त्यावर वसलेले हे गाव,  येथे आता मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे मला वाटते कि अष्टागरातील सगळ्यात जास्त शहरीकरण झालेले हे एकमेव गाव आहे. सरावलीत आता जुन्या घरांच्या जागेवर नवीन बंगले आणि इमारती पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी आजही जुन्यापद्धतीची टुमदार घरे आपण पाहू शकता. ब्राह्मण आळीमध्ये प्रशस्त सिमेंटचे रस्ते आहेत. त्यामुळे सहज सोप्या पद्धतीने दळण वळण करता येते.

सरावली गावात नाईक, जोशी, रोडे, कुलकर्णी तसेच रत्नाकर ही कुटुंबे वस्त्याव्यास आहेत. त्यांची येथील आणि बाहेर वस्त्यव्यास असणारी अंदाजे ७५ लोकसंख्या असावी. विस्तृत माहिती पुढील प्रमाणे,

नाईक कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी असून गोत्र कात्यायन आहे.

जोशींची कुलस्वामिनी श्री पिंपळादेवी, सातारा असून वसिष्ठ हे त्यांचे गोत्र आहे.

गावात रोडे मंडळी सुद्धा वास्त्यव्यास आहेत त्यांची कुलस्वामिनी श्री पाटणादेवी, चाळीसगाव असून भारद्वाज गोत्र आहे.

रत्नाकर कुटुंब गेली अनेक वर्ष येथे असून त्यांची कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी असून भारद्वाज गोत्र आहे. 

येथे अनेक वर्षापासून कुलकर्णी कुटुंब स्थायिक असून त्यांचे गोत्र वसिष्ठ आहे आणि कुलस्वमिनी श्री रेणुका माता आहे.

गावात मुख्यत: पौरोहित्य केले जाते इथल्या ब्राह्मणेतर समाजातील बऱ्याच गावात येथील ब्रह्मवृंद पौरोहित्य करतात. जोशिंचे यजमान सरावली, महागाव, कुकडे, नागझरी, किराट, बोरशेती पर्यंत असून नाईकांचे उमरोळी, पंचाळी ,आगवण आणि परिसरात आहेत. येथील पुरोहित वसई विरार तसेच मुंबईत देखील पौरोहित्य करतात.  येथील ब्रह्मवृंदांवर ब्राह्मणेतर समाजाचा मोठा विश्वास असून इतर अष्टागारातील गावांप्रमाणे यांनाही समाजात बहुमान आहे.

वैद्यकीय क्षेत्रात येथील दोघांचा समावेश आहे, येथील जोशी कुटुंबातील डॉ. श्वेता मुकेश जोशी ह्या MS in Obstetrics and Gynaecology अर्थात स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. तर डॉ अमित दिलीप जोशी हे DM Super Specialist in Gastroenterology आहेत.

मुळचे सातारा येथील पण आता येथे स्थायिक असणारे स्वप्निल सतीश शहाणे बैंकेत ब्रांच मॅनेजर आहेत या कुटुंबाचे गोत्र शांडिल्य असून श्री महालक्ष्मी कुलस्वामिनी आहे.

सरावली मध्ये एक गोगटे कुटुंब असून आलेवाडी चे नाईक कुटुंबाचे ते जावई आहेत आलेवाडी च्या कन्या संध्या गजानन नाईक (पूर्वश्रमीचे नाव) ह्याचे हे सासर असून त्या स्वतः  शासनाच्या अंगणवाडी विभागात उच्चपदस्थ होत्या आता सेवा निवृत्त आहेत.

सरावली येथील बरीच मंडळी शिक्षक आहेत काही सेवा निवृत्त झाले आहेत आजही त्यांना पंचक्रोशीत बहुमान आहे.   येथील काही स्त्रिया अंगणवाडी शिक्षिका तसेच पोस्टाची कामे करतात. तर मुळच्या पोखरणच्या कन्या सौ स्वाती श्रीकांत जोशी स्वतः वधुवर सूचक मंडळ चालवतात. येथील मिथुन सुरेश जोशी नोकरी निमित्त कॅनडा  येथे वास्त्यव्यास आहेत.

येथील मंडळी सरपंच, पोलीस, पोलीस पाटील म्हणून पदे भूषवित आहेत. काही मंडळी खाजगी नोकरी करत असून काही सरकारी नोकरीत आहेत, प्राध्यापक आहेत, काहींचे व्यवसाय आहेत. येथील श्री सुरेश जोशी बँकेत उच्चपदस्थ होते. खैरापाडा स्थित श्री अविनाश जोशी हे NPCIL म्हणजेच अणुऊर्जा केंद्र काकरापारा गुजरात येथे Manager-Hopitality  या पदावर कार्यरत होते आता सेवा निवृत्त आहेत.

येथील जुनी आठवण सांगायची तर येथील कै. गजानन सदाशिव नाईक हे नाट्यकर्मी होते, ते अभिनय, दिग्दर्शन करीत असत आणि अभिनय कला शिकवीत असत त्यासोबत ते पौरोहित्य देखील करीत.

येथील रोडे कुटुंबाची कुलस्वामिनी श्री पाटणा देवी (चाळीसगाव) असून हे एक शक्तीपीठ आहे सतीच्या उजव्या हाताचा भाग येथे येऊन पडला होता म्हणून वरदहस्त शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. हे एक जागृत पीठ आहे. १२ व्या शतकात उभारले गेलेलं हे हेमाडपंथी मंदिर एक पर्यटन स्थळ आहे. निसर्गाच्या सानिध्यात हे विसावलेले सुंदर मंदिर नवरात्रीला खूप बहरलेलं असते येथे वर्षभर भक्तांचा राबता असतो. देवीचे रूप सप्तशृंगी देवी प्रमाणे आहे.

श्री पाटणादेवी मंदिर, चाळीसगाव 

 


श्री पिंपळा देवी :- 
 येथील जोशी कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे. साताऱ्या पासून अंदाजे 50  किलोमीटर वर औंध येथे देवीचे स्थान आहे.  श्री यमाई आणि तसेच श्री काळूबाई या नावाने देखील देवीला ओळखले जाते.  औंध येथे गडावर किल्ल्यामध्ये देवीचे मंदीर आहे.  देवीची मूर्ती काळ्या पाषाणात असून देेेेवी दोन मीटर ऊंच आहे, मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या हातात गदा, त्रिशूळ, धनुष्यबाण आणि पानपात्र आहे. मकर संक्रांतिला देविचा मोठा उत्सव असतो.
कोल्हापुरची अंबाबाई आणि श्री राम देविला "ये माई" अशा प्रकारे बोलवित असत त्यावरून देवीस यमाई हे नाव प्राप्त झाले आहे अशी आख्यायिका आहे.


 सौजन्य :- मला सरावली पोस्ट लिहिण्यासाठी श्री विनोद नाईक, सौ वनिता विनोद नाईक, श्री विकास विनोद नाईक तसेच  श्री रुपेश शशिकांत जोशी ह्यांनी बहुमूल्य मदत केली आहे.

वाचा आलेवाडी बद्दल माहिती,

वाचा नांदगांव बद्दल माहीती,

वाचा टेंभी बद्दल माहीती,

वाचा अष्टागर प्रस्तावना. 


Wednesday, September 30, 2020

अष्टागरातील टेंभी गाव

श्री गणेशाय नमः 

 नमस्कार, मी अजित विनोद पंडीत (आलेवाडी) आपल्याला सगळ्यांना अवगत आहेच की आपण या ब्लॉगच्या माध्यमातून अष्टागर ब्राह्मण समाजाविषयी जाणून घेत आहोत. तुमच्या अभिप्रायांवरून मला कळतंय की माझ्याकडून आपल्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे माहिती विश्वासार्ह आणि खरी असावी हा माझा प्रयत्न असतो. अनावधानाने कुठली माहिती राहिली असेल तर मला माझ्या व्हाट्सअप वर पोस्ट करा माझा नंबर मी आलेवाडी च्या पोस्ट मध्ये दिला आहे. आणखी एक महत्वाचा उल्लेख मी करेन की आपल्या ब्लॉगचा सगळ्यात जास्त वाचकवर्ग पुण्यात आहे तसेच अमेरिका, इंग्लण्ड, दुबई, अशा अनेक देशात आपला ब्लॉग वाचनात येतोय मी त्यांचे आभार मानतो आणि मूळ विषयाकडे येतो आज आपण अष्टागर ब्राह्मण समाज, पालघर ह्यापैकी टेंभी गावाविषयी जाणून घेऊयात. 

 टेंभी :- बोईसर पासून अंदाजे ६ किलोमीटर वर हे गाव असून नवापूर रोड पासून ५०० मीटर आतमध्ये हे गाव वसले आहे. ब्राह्मण लोकवस्तीच्या सुरुवातीलाच श्री दत्तगुरूंचे पवित्र मंदिर आहे. येथे आपल्या अष्टागरातील ब्राह्मणांची अंदाजे लोकसंख्या ५७ असून नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असणारी लोकसंख्या अंदाजे ११४ आहे. गावात राणे, पंडित आणि पांडे ही कुटुंबे राहत असून राणेंची कुलदेवता सफाळे एडवण येथील श्री आशापुरी माता आहे तर गोत्र गार्ग्य आहे, कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी-कोल्हापूर पंडितांची कुलस्वामिनी असून गोत्र मैत्रेय आहे. पांडे कुटुंबाचे भार्गव हे गोत्र असून श्री महालक्ष्मी-कोल्हापूर त्यांची कुलस्वामिनी आहे. 

येथील ब्रह्मवृंदांची घरे समोरासमोर असून मध्ये रुंद व प्रशस्त रस्ता आहे. येथील जवळपास प्रत्येक घराचा पाया म्हणा किंवा व्हरांडा जमिनीला सलग नसून बऱ्यापैकी उंचीवर आहे. गावात नवीन तसेच पुरातन पद्धतीची छान घरे आहेत. 


पंडितांचे पुरातन घर, टेंभी

                                                                           
ब्रह्मवृंदांची घरे,टेंभी 


आपल्या अष्टागरातील इतर गावाप्रमाणे इथेही काही ना काही विशेष आहेच. सुरुवातीला आपण सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर माननिय रजनी पंडित ह्यांच्या बद्दल माहिती घेवूयात. गावातील पंडित कुटुंबात १९६२ साली रजनी ताईंचा जन्म झाला. त्या मुंबईत वास्तव्याला असतात त्यांचे पूर्ण नाव रजनी शांताराम पंडित आहे, त्यांचे वडील स्वतः सब इन्स्पेक्टर-पोलीस होते. महाराष्ट्रातील आणि भारतातील त्या पहिल्या खाजगी महिला गुप्तहेर ठरल्या आहेत. 
श्री गुरुदेव दत्त, टेंभी 

त्यांच्या मुलाखती आपण खूप वेळा टीव्ही वर पाहतोच त्यांची प्रसिद्धी आपण सगळे जाणून आहोतच. अतिशय Challenging आणि महत्वाकांक्षी करियर त्यांनी निवडले आहे. खूप मोठ-मोठ्या आणि अतिशय गंभीर स्वरूपाच्या केसेस त्यांनी हाताळल्या आहेत. प्रसंगी स्वतःच्या जीवाची बाजी लावून देखील त्यांनी आपले कार्य पूर्ण केले आहे. रजनी ताईंनी दोन पुस्तके लिहिली आहेत पहिले "Faces Behind Faces" आणि दुसरे "मायाजाल"  पहिल्या पुस्तकाला दोन तर दुसऱ्या पुस्तकाला सहा पुरस्कार मिळाले आहेत. 

दूरदर्शन सह्याद्री चा "हिरकणी" पुरस्कार त्यांना मिळाला असून असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांचा संदर्भ घेऊन दिनेश राव ह्यांनी "Lady James Bond" ही डॉक्यूमेंटरी फिल्म बनवली आहे. लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येणार आहे. आपल्या सगळ्या अष्टागरातील मंडळीना त्यांचा सार्थ अभिमान आहे. 



सुप्रसिद्ध गुप्तहेर रजनी ताई पंडित 


पुढील माहिती आहे येथील मुंबईस्थित श्री प्रवीण गजानन पंडित ह्यांची, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तिय असून  "शिवसेना भवनाचा" कार्यभार सांभाळतात. 

टेंभी बद्दल जुनी आठवण सांगायची तर येथील कै. बाजीराव पंडित ह्यांची चुन्याची तसेच विटांची भट्टी होती. पूर्वी बांधकाम करण्यासाठी सिमेंट ऐवजी चुनखडी गुळ व इतर काही साहित्य वापरून माल तयार केला जाई. गुजरात, मुंबई पुणे इथवर ह्या मालास मागणी होती. आणखी एक व्यक्ति कै. नारायण परशुराम पंडित हे त्यावेळेस वेदशास्त्री पंडित होते त्यांना अष्टागारात बहुमान होता. 

टेंभी येथील वेसावे स्थित स्वातंत्र्यसैनिक कै श्री दामोदर नारायण पंडित ह्यांनी १९४२ च्या भारतीय क्रांतिकारी आंदोलनात सहभाग घेतल्याने एक वर्षाचा कारावास भोगला होता ही अभिमानस्पद बाब आहे तसेच त्यांचे सुपुत्र डोंबिवलीस्थित श्री विनोद दामोदर पंडित परिवहन विभागात व त्यांच्या पत्नी सौ चारू विनोद पंडित ह्या बँकेत उच्चपदस्थ होत्या व आता दोघेही सेवानिवृत्त आहेत. त्यांची कन्या सौ ऋचा विनोद पंडित - पुराणिक यांनी रशिया येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून स्त्री रोग तज्ज्ञ (Gynacologist) विशेषज्ञ आहेत तसेच सुपुत्र श्री स्मित विनोद पंडित ह्यांनी अमेरिकेत Master of Science ही पदवी प्राप्त केली आहे व सध्या ऑस्ट्रिया देशात एका नामांकित कंपनीत उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. 

येथील ब्रम्हवृंद पौरोहित्य, शेती, आणि खाजगी नोकरी करत असून काही मंडळी व्यवसाय करतात काही MBA, Engineering, IT, शिक्षिका, शिक्षक, सरकारी नोकरी, राजकारण अशा क्षेत्रात आहेत. गावातील बरीच मंडळी, मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत तर काही परदेशातही आहेत. काही व्यक्ति नोकरिनिमित्त परदेशवारी करून आले आहेत. आजोळ टेंभी असणारे श्री मोहन जोशी पालघर येथे प्रख्यात वकील आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्ती सदस्य या समाजाने गावाला दिले आहेत पुरुषांसोबत येथील स्त्रियांचा यात वाटा आहे. 

काही उल्लेखनीय नावे जसे कि श्रीमती माधवीताई मुरली पंडित ह्या नवीमुंबई येथे मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. सौ आशा जोशी  टेंभीच्या कन्या बजाज या कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहेत. येथील श्री दर्पण पंडित लंडन येथे  IT Engineer म्हणून कार्यरत असून  त्यांचा SSC बोर्डात जनता हायस्कुल या शाळेत प्रथम क्रमांक आला होता व अनेक वर्ष त्यांच्या एकूण गुणांच्या जवळपासही कोणी विध्यार्थी पोहचू शकले नव्हते. त्यांचे बंधू श्री समीर पंडित देखील IT Engineer असून त्यांची देखील कामानिमित्त लंडन वारी झाली असून इन्फोसिस मध्ये उच्चपदस्थ आहेत. श्री सुभाष पंडित देखील कामानिमित्त ओमान  तसेच टर्की येथे वास्त्यव्यास होते. श्री अरुण पंडित हे देखील ग्रामविकास अधिकारी होते आता सेवानिवृत्त झाले आहेत. सौ चारुशीला पिंपूटकर श्री शंकर नीलकंठ पंडित ह्यांची कन्या त्यांचे स्वतःचे वधुवर सूचक मंडळ होते 30 वर्ष त्यांनी ते चालवले.

आता आपण गावातील दत्तमंदिराविषयी जाणून घेणार आहोत. येथील दत्तमंदिर ब्रम्हवृंद सांभाळत असून १९४५ साली हे मंदिर उदयास आले आहे तत्पूर्वी येथे श्री रामाचे मंदिर होते. कै. श्री मधू पंडित ह्यांनी मंदिर उभारणीत अतिशय महत्वाचा वाटा उचलला होता तसेच गावकऱ्यांनी देखील खूप मेहेनत घेतली आहे. 

श्री पांडुरंग पंडित ह्यांनी मूर्ती तसेच मंदिर बांधणीसाठी लागणारे कारागीर जयपूर हुन आणले होते. श्री पांडुरंग पंडित हे पोलीस पाटील होतेच तसेच सरकारी कंत्राटदार होते ते स्वतः व त्यांचे बंधू कै. बाजीराव पंडित ह्यांनी मंदिरासाठी आपली जागा उपलबद्ध करून दिली होती. 

येथील श्री दत्तगुरूंची संगमरवरातील प्रसन्न मूर्ती धेनु सोबत उभी आहे.पुरातन मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला आहे. प्रशस्त सभामंडप लाभलेले आणि पावित्र्याने भरलेले हे मंदिर असून मंदिरातील श्री मारुतींची आणि श्री गणेशाची आकर्षक आणि तेजस्वी मूर्ती पाहून मन प्रफुल्लित होते. 

येथील जत्रौत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे, मंदिरात उत्सवाला सुमधुर भजनाचा कार्यक्रम असतो तर येथील पालखी संपूर्ण गावात घरोघरी फिरत असते. मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो तसेच १९७० साला पासून दर वर्षी नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री सत्यनारायणाची महापूजा या मंदिरात घातली जाते. 



 येथील श्री कृष्ण जन्मोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा असून अष्टागरात त्याकाळी हा एकमेव उत्सव होता अशी मान्यता आहे त्यामुळे येथे संपूर्ण अष्टागरातून मंडळींची आवर्जून उपस्थिती असे. 

गावात प्रामुख्याने दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होतो तर काही मंडळी ५ दिवस साजरा करतात. दत्तजयंती उत्सव तसेच विविध वार्षिक सण येथे मोठ्या आनंदाने साजरे होतात.

धन्यवाद 

अजित विनोद पंडीत

श्री दत्त मंदिर, टेंभी 

   

पालखी सोहळा 


सौजन्य :- मला ही पोस्ट लिहिण्यासाठी माझे मित्र बंधु अनिकेत अविनाश पंडित आणि कुशल अरविंद राणे ह्यांनी खुप मदत केली आहे. तसेच फोटो सौजन्य पुनम अरुण पंडित ह्याच्या सोशल मिडिया अकाउंट वरुन, सर्वांचे धन्यवाद.

वाचा आलेवाडी बद्दल माहिती,
वाचा नांदगांव बद्दल माहिती,
वाचा सरावली प्रस्तावना.
वाचा अष्टागर प्रस्तावना.

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...