Wednesday, July 7, 2021

रूखवत (अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखशृंखलेत तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण या लेखात रूखवत या बद्दल माहिती करून घेणार आहोत, आपल्या ब्राह्मणी पद्धतीनुसार लग्नाच्या दिवशी अष्टागरात देखील वधुचे, मंडपात किंवा कार्यालयात रूखवत मांडले जाते. शोभेच्या, खाण्याच्या वस्तूंचे तसेच संसाराला पूरक आणि काही पारंपरिक गोष्टी तसेच  काही सुविचारांनी नटलेल्या वस्तूंचे हे एक छानसे छोटेखानी प्रदर्शनच असते.



हस्तकला, चित्रकला, पाककला, विणकाम, शिवणकाम, भरतकाम अशा अनेक कलांचा संगम येथे पाहायला मिळतो. लग्नात एका टेबलावर छान वस्तूंची आकर्षक मांडणी केलेली दिसली की समजावे ते रूखवत आहे.

आपल्यापैकी प्रत्येकाने हे रूखवत पाहिले असेलच आणि लग्नात 5 मिनिटे का असेना प्रत्येक व्यक्ती विशेषतः स्त्रिया या रुखवताला नक्कीच भेट देतात. 



हल्ली पारंपरिक गोष्टी जरी कमी होत असल्या तरी रुखवतामध्ये काहीगोष्टी आजही आपले स्थान कायम टिकवून आहेत. स्वतः वधु आणि तिचे नातेवाईक ह्या वस्तू बनवतात. हल्ली बाजारात ह्या रुखवतात योग्य बसतील अशा शोभिवंत वस्तू सर्रास मिळत असल्या तरी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची हजेरी देखील आपण अनुभवताच.



ह्या रुखवतामध्ये छोटी बैलगाडी, छोट्या धान्याच्या गोणी, सप्तपदी आणि प्रत्येक पावलांवर सुंदर उपदेशात्मक लेखन असते (आजही सुंदर हस्ताक्षरात देखील पहायला मिळते), सनई चौघडा, तोरण, हिरव्या बांगड्या त्यातील माहिती ह्या गोष्टी नक्की पाहायला मिळतात. काजू, सुपारी आणि लवंगाची शेंडी असणारे कागदी हवन करणारे भटजी आपली उपस्थिती आजही लावतात.  घरगुती स्वयंपाक घरातील वस्तूंपासून बनवलेले सौभाग्य अलंकार सोन्यालाही लाजवतील इतके आकर्षक असतात.




खाद्य पदार्थात पापड, कुरडया पासून फराळाचे आणि लोणची मुरांबे ते चटण्यापर्यंत बरंच काही असते, बुंदीचे नेहेमी पेक्षा आकाराने मोठे लाडू भाव खाऊन जातात तसेच वधु वरांचे नाव, पापड आपल्या अंगावर छान मिरवतात.

रूखवत आलं बाई झाकुनी ग ठेवा,
(वधूच्या घरातील मानाने मोठी स्त्रीचे नाव) माझ्या ग बाईला वडिलीला मान द्यावा.

रूखवत आलं, जिलेबी ग नाही आली,
वधु ग माझ्या बाईच्या आईला ग घाई झाली.

रूखवत आलं सरी सांडली तेलाची,
(आईचे नाव) बाई माझी वरमाई ग लेकाची


गृहपयोगी वस्तूंची रेलचेल पाहून वधुच्या मानातील आपल्या नवीन संसारासाठी लागणाऱ्या गोष्टींची केलेली तजवीज जाणवते.

वधुकडील मंडळी सकाळी छान रूखवत मांडत असतात तर पाठवणीच्या प्रसंगी वराकडील मंडळी अलगद पण लगबगीने ह्या वस्तू उचलत असतात. निघताना रिकाम्या टेबलावर वधुच्या माऊलीसाठी वरपक्षाकडून साडी ठेवली जाते. 



माझा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की लिहा, आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाच्या आहेत. 

धन्यवाद,

रूखवत सौजन्य:- सौ. अंकिता तिवाड-पंडीत आणि सौ स्वाती लवाटे.
गाण्यासाठी आभार : श्रीमती जैमिनी वसंत पंडीत(पूर्वश्रमीचे नाव)











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

Sunday, May 16, 2021

अष्टागरातील लग्नसमारंभातल्या रितिभाती

 श्री गणेशाय नमः


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत अष्टागरातील लग्नसमारंभ ह्या लेखमालेत मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. आत्तापर्यंतच्या आपल्या लेखमालिकेत आपण कुंकू लावण्याची प्रथा ते हळद लावण्याच्या प्रथेपर्यंत अनेक विवाह निगडित संस्कार, रितिभाती विधी ह्यांना उजाळा दिला आहे. आज आपण आपल्या अष्टागरात विवाह संस्कारात आणखी कुठल्या पद्धती पायंडे आहेत ते जाणून घेऊयात सोबत पारंपरिक गाणी असणार आहेतच.


आपला समाज हा मनुष्यप्रिय असून नातेसंबंध जपणारा आहे. आपल्या प्रत्येक कार्यात आपले नातेवाईक किंवा आप्त आपल्या सोबत रहावे या उद्देशाने काही प्रथा आहेत त्या आपण पाहुयात ह्यामुळे आपली नाती अधिक दृढ होतात.

लग्नात वर/वधूच्या मामास खूप महत्व आहे, सर्वप्रथम वर/वधुस मामा हाती कांकण बांधतो. वधुसाठी लागणारे वधूवस्त्र अर्थात पिवळ्या रंगाची साडी, आपल्याकडे अष्टागरात त्यास पारणेट म्हणतात हे नेसून वधु लग्नासाठी तयार होते ते मामाकडून असतं आणि चोळी(ब्लाऊज) वधुच्या मावशीने आणावी अशी पद्धत आहे. तसेच मामा वधुला बोहल्यावर उभी राहण्यासाठी घेऊन येतो. पुढील गाण्यांच्या ओळी बघा काय म्हणतायत.

"मामाचं पातळ मावशीची कांचोळी,
वधु (चे नाव) न ग बाई माझी गौरी हाराची पुतळी"

मामा वधुला घेऊन येताना


लग्नात करवलीस बहुमान आहे हे काही मी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. वधु/वरासोबत करवली प्रत्येक रितिभाती मध्ये अग्रस्थानी असते. वर/ वधूची बहीण करवली म्हणून लग्न मुंजीत आवर्जून लागतेच.

"मंडपाच्या दारी, करवल्या दहा वीस,
आणि करवली(चे नाव) बाई माझे मानाचे खाली बस"

"रुसली ग करवली, नाही येणार मांडवा,
करवली(चे नाव) न ग बाई माझी पायी धरिसी पांडवा".

जशी लग्नात करवली लागते तसेच "कानपिळी" या रितीसाठी वधूचा भाऊ उपस्थित असतो, माझ्या बहिणीचा योग्य सांभाळ करा असे सांगत प्रेमाने आणि गमतीने वराचा कान तो धरतो आणि नवरा मुलगा (वर) त्यास वचन देऊन योग्य तो आहेर या प्रसंगी देतो.

"कानपिळी"ची प्रथा

लग्नात जसा वर/वधूच्या बहिणीस बहूमान असतो तसाच जावयास देखील मान असतो अष्टागरात लहान बहिणीच्या लग्नात मोठ्या बहिणीच्या पतीस, सासरे बुवा आहेर करतात यथाशक्ती एखादी सोन्याची किंवा मौल्यवान वस्तू भेट म्हणून देतात तसेच आपल्या कन्येस व नातवंडासही योग्य तो आहेर देतात.

"बुंदीचे ग लाडू, जावयाच्या फराळाला,
एवढा ग अग्रमान, लेकीकारण जावयाला"

अशाप्रकारे आपल्या रिती भाती आपली माणसे जोडून ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणखी कुठल्या प्रथा आहेत ते पुढे पाहुयात.

अष्टागरात लग्न किंवा मुंज लागतेवेळी वधु आणि वराची आई(वरमाय) तेथे उपस्थित न राहता तुळशी समोर किंवा देवाजवळ हात जोडुन उभी असते.

लग्नमंडपास प्रवेशद्वार असतं त्यास दोन केळी बांधल्या जातात त्यास केळीचे खांब म्हणतात. ही केळीची झाडे केळीच्या घडाने लगडलेली असतात. ह्या केळी बांधताना सुवासिनी त्यांचे व या केळी आणणाऱ्या मंडळींचे औक्षण करतात.



केळीच्या खांबाचे प्रवेशद्वार

लग्नाच्या काही दिवस आधी कासाराला (बांगडया वाली स्त्री) आमंत्रित करून घरातील स्त्रिया आणि शेजारील तसेच आळीतील स्त्रियांना बांगड्या भरल्या जातात. वधुकडे वधुस हिरवा चुडा भरला जातो यात २१ बांगड्या असतात. बांगड्यावालीस पैसे आणि शिधा नारळ देण्याची प्रथा आहे. जेवणाची वेळ असल्यास भोजन करवूनच त्या बांगड्यावाल्या स्त्रिला निरोप दिला जातो.

वधुस मेंदी लावण्याचा कार्यक्रम सुद्धा छोटेखानी पद्धतीनं केला जातो, वरास देखील थोडीशी मेंदी लावली जाते.

हिरवा चुडा आणि मेंदी

अशा अनेक प्रथा परंपरांचे पालन करत आपल्याकडे लग्नसोहळा पार पाडला जातो, पुढील भागात आपण लग्नविधी बद्दल माहिती घेवूयात.

धन्यवाद.

गाण्यांसाठी विशेष आभार:- माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत (पूर्वाश्रमीचे नाव)











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Sunday, May 2, 2021

केळवण(अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः



नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ ह्या लेखमालेत आपलं सगळयांचे मनःपूर्वक स्वागत. दिवसेंदिवस आपली ही लेखमाला अधिक खुलत आहे आणि हळूहळू पुढे सरकत आहे. आज आपण वधुस/ वरास हळद लावण्याच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत त्यास केळवण असे म्हणतात.

आपण सगळेच जाणून आहात की हळद ही आरोग्यासाठी अतिशय लाभदायक अशी औषधी वनस्पती आहे, आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. लग्न म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात असते अनेक जबाबदाऱ्या ओघाने दोघांवर येत असतात त्यासाठी निरोगी असणे अती आवश्यक आहे, म्हणूनच आपल्या आर्यावर्तात/भारतात लग्नाआधी हळद लावली जाते हे काही मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

आपल्याकडे लग्नाआधी वर/वधुस हळद लावण्याची प्रथा आहे आणि या केळवणाच्या कार्यक्रमात हळदी सोबत केसाला शिरं म्हणजे नारळाचे दूध, सुगंधी तेल देखील लावले जाते, केळवण, तेलवण, ह्याबद्दल जाणून घेऊयात.

आदल्या दिवशीच (गहू टिपण्याचा वेळेस वर/वधु कडून कुटून घेतलेली) हळद त्यात चंदन भुकटी(पावडर) घालून रात्रभर भिजवली जाते. केळवणाच्या आधी ओल्या नारळाचे दूध शिरं तयार केले जाते. ह्या कार्यक्रमास स्रीवर्गास विशेषतः आमंत्रण असतं कारण हा कार्यक्रम सुद्धा मुख्यतः त्याच पार पाडत असतात.

केळवण करताना वर/वधु सोबत करवली आणि आई वडील ह्यांना पाटावर बसवून त्यांचे पाच सुवासिनी औक्षण करतात,  सुरुवातीला सुवासिनी आंब्याच्या पानाने वधुस/वरास हळद लावतात आणि ही हळद आधी पायाला, गुढगे हात अशाप्रकारचे वर चढवली जाते. वर/वधु पाठोपाठ करवली, आई वडील ह्यांना हळद लावली जाते मुहूर्ताची हळद लावून झाली की हाताने हळद लावली जाते सोबत पारंपारिक गाणी गायली जातात. वराची उष्टी हळद वधुसाठी पाठवली जाते. केळवण घरात किंवा मंडपात करण्याचा प्रघात आहे.




मंडपाच्या दारी हळदीचं वाळवण,
....माझ्या ग बाळाचे/बाईचे नवऱ्याचे/नावरीचे केळवण.

हळदी लाविल्या सारणी दंडीवाहे पाणी
तेवत्या मालिनी दाल देता,

बहू जाहले उशीर चिंते तुमचे दीर लक्ष्मण,
लक्ष्मणाचे धोतरे चंदन माखले, वाळत घातले नाग चाफे.

हळद लावून झाली की तेलवण केले जाते, डोक्याला शिरं आणि सुगंधी तेल लावले जाते. खायच्या पानाला तेल लावून ते डोक्यावर पडेल अशा पद्धतीने पाच सुवासिनी पान हाताळतात आणि गाणी गातात.

तेलवण 

चाफेलं धुपेलं मोगरेल तेल, 
त्या तेलवणासाठी चौघी सुवासिनी 
उभ्या देवापुढे लक्ष तेलवण पडे,

आधी पडे देवाला 
नंतर पडे मुहूर्तमेढी, 
नंतर पडे नवऱ्याला/ नवरीला.

अशोक वनामध्ये उभी 
सिता मंजुळ करूनी, तितक्यात आले मारुती,  
झाडावर चढोनी, चमत्कातर पाहुनी, टाकुनी मुद्रिका, 
सीता मनी दचकली.

त्यानंतर दोन उडदाचे पापड, एक पापड वधु/वराच्या हातात आणि दुसरा सुवासिनीच्या हातात घेऊन त्यात सुपारी एका पापडातून दुसऱ्या पापडात फिरवली जाते असे पाच सुवासिनी करतात. त्यावेळेस हे गाणे गायले जाते.

लोणं-मुणं भरली ताट ससूये घाट,
घाट जो रुंदला वेलाणीया आगर रुंदला,

विष्णुनावे हाताचे कांकण देऊ करा.
आणा हो चावी या उघडाहो पेटी या,
 काढाहो ठुशि या पेहेराव हाती,

या "अलका" बाई अलका बाई आत्या,
"विनोद" देव पिता "विद्या" बाई माता,
या दोघा तिघांचे पूर्व सोवाळे,
नवऱ्याला/ नवरीला तेल चढे.


ह्यानंतर वधु/वराची अंघोळ झाली की त्यांच्या पायावर कुंकवाने केळवे काढले जातात म्हणजेच कुंकू भिजवून  (पाणी किंवा तेलात) पायावर स्वस्तिक आणि मेंदी प्रमाणे नक्षी काढली जाते. या वेळी वधु/वराचा मामा हाताला कांकण बांधतो.

मामा मांडीपाट, मामी काढिते रांगोळी,
....माझ्या ग बाळाचे/बाईचे केळवण आजवेळी.

कुठल्याही शुभ कार्यात आपण देवाला विसरत नाही त्यामुळे ग्रामदेवता तसेच गावातील इतर देवतांना न विसरता वधु/वर मंदिरात आशीर्वादासाठी जाण्याची प्रथा आहे, सोबत घरातील तसेच आळीतील मंडळी आणि वाध्यवृंद असतो. मंदिराच्या कळसावर भगव्या रंगाचा बावटा(झेंडा) लावला जातो, वधु/वराच्या हस्ते देवाची यथासांग पूजा करून नारळ फोडला(वाढवला) जातो.


अष्टागर परिसर समुद्राच्या जवळ असल्या कारणाने येथिल कोळी, आगरी तसेच आणखी ब्राह्मणेतर समाज बांधव आपल्या आमंत्रणाला मान देऊन केळवणाच्या दिवशी/रात्री आवर्जून स्नेहभोजनासाठी उपस्थित असतात त्यांच्या संस्कृती मध्ये हळदीच्या कार्यक्रमाला खूप महत्व आहे.

वाजंत्री, नृत्य आणि भरपूर मौज करून केळवणाचा कार्यक्रम आनंदात साजरा केला जातो.

ऑर्डर करा 9637847937


लग्नाआधी म्हणजेच लग्नाला काही दिवस शिल्लक असताना जवळचे नातेवाईक वधुस/वरास केळवणासाठी आमंत्रित करण्याचा प्रघात आहे, यावेळी हळद न लावता फक्त पायावर केळवे काढून औक्षण केले जाते. स्नेहभोजन आणि भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता केली जाते. काही ठिकाणी ह्या केळवणाच्या वेळी हळद लावून मोठा कार्यक्रम केला जातो मात्र वधु/वरास इतर कामानिमित्त बाहेर फिरावे लागत असल्या कारणाने हळद लावणे शक्यतो टाळले जाते.

तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला ही लेखमाला कशी वाटते नक्की कळवा.

धन्यवाद.

पारंपरिक गाण्यांसाठी सौजन्य:- नेहेमी प्रमाणे माझी आत्या "श्रीमती जैमिनी वसंत पंडीत"

पुढील लिंकवर क्लिक करून इतर पोस्ट वाचा. 











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Friday, April 16, 2021

देव-देवक/ग्रहमख (अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपलं सगळ्यांच मनःपूर्वक स्वागत. आपण आत्तापर्यंत वधुस कुंकू लावणे, साखरपुडा आणि गहू टिपणे ह्याबद्दल माहिती करून घेतली आहे. आपल्या लग्नसमारंभ ह्या लेखांना किंवा पोस्टना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, तुमच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून मिळत आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आपल्या ह्या पोस्ट (भारतात) सर्वात जास्त पुण्यात वाचल्या जातात तर भारताबाहेर अमेरिकेत वाचल्या जातात, कॅनडा, दुबई मध्ये देखील वाचकवर्ग आहे. मी आपल्या सर्व वाचकांना धन्यवाद देतो आणि आपल्या विषयाकडे येतो.

आज आपण "देव देवक" किंवा ग्रहमख ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. लग्नाला अगदी काही दिवस राहिले की देव देवता आणि ग्रहांचे पूजन केले जाते. शक्यतो देवक हे लग्न किंवा मुंजेच्या आधी समसंख्येने म्हणजे दोन, चार किंवा सहा दिवस ह्या प्रमाणे स्थापले जाते. एकदा देव देवक झाले की लग्नविधी मध्ये सोयर सुतक आले तरी त्याची अडचण होत नाही, पूढील कार्य निःसंकोचपणे पार पाडता येतात.

सकाळी घरातील देव-देवतांचा आशीर्वाद घेऊन वराकडून/वधुकडून घराच्या मुहूर्तमेढीची पूजा केली जाते.

या दिवशी नवग्रह पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, घाणा, जात्याचे पूजन, तसेच नंदिनीं देवतांचे पूजन, तसेच यज्ञ/हवन केले जाते. वधु/वर आई वडील आणि करवली यांच्या हस्ते हे कार्य पार पाडले जाते. 

ग्रहमखाच्या वेळी घरचा आहेर देण्याची प्रथा आहे. घरातील मंडळी म्हणजेच  वर किंवा वधूचे जवळचे नातेवाईक किंवा आईचे माहेरचे या वेळी पहिला आहेर देतात.  

आपल्याकडे आंब्याच्या वृक्षाला शुभकार्यात अढळ स्थान आहे, आंब्याच्या पानांच्या माळा, कलशावर आंब्याची पाने, तोरण तर ग्रहमखासाठी नंदिनी देवता तयार केल्या जातात, आंब्याच्या छोटया डहाळ्या घेऊन त्यास आंब्याचे पान गुंडाळून वर धागा बांधला जातो  अशा या सहा नंदिनीं देवतांचे पूजन करण्याचा प्रघात आहे शास्त्रानुसार त्यांना नांदीन्यादि मंडप देवता असे म्हणतात.. 

आपण जो दारापुढे मंडप घालतो त्यास पूर्वी ५ खांब असत चहूबाजूला ४ आणि १ खांब  मध्ये आधारस्तंभ असे एकूण ५  खांब  तसेच मंडपाच्या प्रवेशद्वारी १ खांब असे तो ६ वा खांब. ह्या सहा खांबांना ह्या देवता आवाहन आणि पूजन करून बांधल्या जात असत त्या पुढील प्रमाणे नंदिनी, नलिनी, मैत्रा, उमा, पशुवर्धिनी ह्या पाच मंडपात आणि मंडपाचे रक्षण करण्यासाठी सहावी मंडपाबाहेर शस्त्रगर्भा भगवती. हल्ली मंडपाची पूर्वीसारखी पावित्र्यता राखता येत नसल्या कारणाने त्यांस घरात  देवकाशेजारी सुपामध्ये पूजन करून स्थानापन्न केले जाते. 

नंदीनी देवतांचे पूजन


घाणा :- रोवळी (बांबू पासून बनवलेली उखळी) मध्ये दोन मुसळ ठेवली जातात दोन्ही मुसळांना एकत्र आंब्याच्या पानांची माळ घातली जाते. रोवळीमध्ये भात(साळी), उडीद, सुपारी, तांदूळ आणि हळकुंड घातले जातात आणि कांडले/कुटले जाते, वधु/वर आणि इतर ५ सुवासिनी मिळून ही रित करतात सोबतीला पारंपरिक गाणी असतातच. त्यास घाणा पाडणे/ भरणे असे म्हणतात.



पहिला घाणा घालू खंडिये भाताचा,
मंडपी गोताचा गणराज,

दुसरा घाणा घालू खंडिये गुलाल,
मंडपी दलाल गणराज,

तिसरा घाणा घालू खंडिये सुपारी,
मंडपी व्यापारी गणराज,

चौथा घाणा घालू खंडिये खारीक,
मंडपी बारीक गणराज,

पाचवा घाणा घालू खंडिये हळद,
मंडपी दळद गणराज.

तद्नंतर जात्यावर उडीद दळले जातात, जात्याला आंब्याच्या पानाची माळ घातली जाते, त्यात उडीद घालून वर/वधु आणि इतर स्त्रिया जात्यावर उडद्या मुहूर्त करतात. जात्यावर उडीद दळताना पारंपरिक गाणी गायली जातात.

जात्यानरे गणपती तुला तांदुळाचा घास,
वर/ वधू मोतीयाचा घोस.

जात्यानरे गणपती तुला सुपारी वाहिली,
वर/वधुस हळद लागली,

जात्यानरे गणपती तुला दूर्वाची जुडी,
अम्माघरी ग कार्य मोरया ग घाली उडी,

अशाप्रकारे आनंदात देवदेवक स्थापित केले जाते लग्न झाल्यानंतर त्याची उत्तरपूजा केली जाते. 

गाण्यांसाठी विशेष आभार:- माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत (पूर्वाश्रमीचे नाव), 
तसेच श्री प्रसाद तिवाड आणि श्री विजय पंडीत ह्यांचे खूप आभार.

धन्यवाद.

ऑर्डर साठी 9637847937 ह्या क्रमांकावर संपर्क करा











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


Friday, April 2, 2021

गहू टिपणे(अष्टागरातील लग्नसमारंभ)

 श्री गणेशाय नमः

नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या लेखमालेत आपले सगळ्यांचे स्वागत, या लेखमालेतील हे तिसरे पुष्प आहे. आज आपण "गहू टिपणे" या प्रथेबद्दल माहिती करून घेणार आहोत. काही ठिकाणी यास भात हळदीचा मुहूर्त असे म्हंटले जाते मात्र अष्टागरात "गहू टीपणे" म्हणतात. मी वाचकांना आवाहन करतो की आपल्या या प्रथा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्धेशाने जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, फेसबुकवर शेअर करा जेणे करून आपल्या या रितिभाती सर्वश्रुत होतील.

साखरपुडा आटोपला की लगबग सुरू होते आमंत्रणांची, कुलस्वामिनी, ग्रामदेवता तसेच घरातील देवांना आमंत्रण पत्रिका देऊन झाली की बाकी आमंत्रणे केली जातात.  लग्नाला काही दिवस राहिले की गहू टिपण्याचा कार्यक्रम केला जातो, काही ठिकाणी आमंत्रणं सुरू करण्यपूर्वी सुद्धा हा कार्यक्रम शुभमुहूर्त म्हणून केला जातो.



वरपक्ष आणि वधुपक्ष दोन्ही ठिकाणी हा घरगुती कार्यक्रम केला जातो, वधूपक्ष आपल्या घरी आणि वरपक्ष आपल्या घरी (मुखत्वे स्त्रिया) हा कार्यक्रम पार पाडतात, ह्यासाठी शेजारील तसेच आळीतील स्त्रियांना खास आमंत्रण दिले जाते.

या दिवशी पहिली मुंडावळ बांधली जाते आणि शक्यतो जुनी मुंडावळ बांधण्याची प्रथा आहे. या कार्यक्रमात कोरे सूप घेऊन सुपास आंब्याच्या पानाची माळ बांधली जाते, त्यात गहू ठेवले जातात या गव्हांमध्ये पाच खडे, पाच खारका, पाच हळकुंड घातले जातात किंवा आपल्या प्रथेनुसार इतर गोष्टी घातल्या जातात, समई प्रज्वलित केली जाते. होणाऱ्या वधुचे किंवा वराचे औक्षण केले जाते, त्यानंतर ह्या सुपाभोवती स्त्रिया आणि वर किंवा वधु बसून गव्हांमघ्ये हात फिरवत पारंपारिक गाणी गातात. सोबत व्हीडिओ आहे तो नक्की पहा.

"सारवल्या भिंती, वर काढिले पोपट,
वधूचे/ वराचे नाव माझ्या ग बाळाच्या लग्नाची खटपट."

"सारवल्या भिंती वर काढिली ताम्हणं,
वधूचे/ वराचे नाव माझ्या ग बाळाच्या लग्नाची सामानं."

व्हीडिओ

केळवणासाठी लागणारी हळद खास वराकडून/ वधुकडून कुटून घेतली जाते. खलबत्त्याला गोल आंब्याच्या पानाची माळ बांधली जाते व त्यात हळद कुटली जाते. प्रथमतः वर/वधुकडून हळद कुटली की स्त्रिया उरलेली हळद कुटतात सोबत परंपरेने चालून आलेली गाणी गातात.

                                       व्हीडिओ

वराकडून मुहूर्तमणी आणि त्यात काळेमणी ओवून घेतले जातात. हा कार्यक्रम म्हणजे विवाहाची दिनांक जवळ आल्याची एकप्रकारे आठवणच आहे. हा कार्यक्रम अल्पउपहार करून संपन्न होतो.

पूर्वी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गहू, तांदूळ निवडले जात, पापड व इतर वाळवणं केली जात, लोणची मुरांबे करून लग्नासाठी लागणारी सर्व तयारी केली जाई.

"रात्री दळू गहू, दिवसा दळू पापडीच,
..........माझ्या ग बाळाचं लग्न आलं तातडीचं,"

"रात्री दळू गहू, दिवसा दळू पापड पिठी,
........माझ्या ग बाळाचं लग्न आलं कोण्या तिथी"

सुगंधी मसाला अगरबत्ती ऑर्डर करा 9637847936



आणखी एक गाणे :-

"जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
बापापाशी पुसू लागला, माझे लग्न कधी कराल सांगा मला.

जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
आईपाशी पुसू लागला, माझी वरमाय कधी होशील सांग मला.

जाई मोगरा फुलयेला, तेव्हा कृष्णाने धावा केला,
बहिणीपाशी पुसू लागला, माझी करवली कधी होशील सांग मला.

आपण या लेखात ज्या गाण्यांचा उल्लेख केला आहे ती गाणी कोणी लिहिली कधी लिहिली ह्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत मात्र गाणी अवीट गोडीची आहेत आणि आजही मनात जपून ठेवलेली आहेत, तर काही गाणी काळाच्या पडद्याआड गेली आहेत. माझी आत्या श्रीमती जैमिनी वसंत पंडीत(पूर्वाश्रमीचे नाव) हिच्याकडच्या गाण्यांचा ठेवा मी येथे उल्लेखला आहे, तीचे खूप आभार. 



धन्यवाद.








वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Sunday, March 28, 2021

अष्टागरातील होळी

श्री गणेशाय नमः



नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आपल्या आजच्या पोस्ट मध्ये आपण अष्टागरातील होळीबद्दल जाणून घेऊयात. अष्टागर आणि परिसरात होळी फक्त एक दिवसाची नसते, तब्बल १५ दिवस आणि धुलीवंदन अशी १६ दिवस होळी साजरी केली जाते.

फाल्गुन शुद्ध पाडव्यापासून दररोज लहान होळी पेटवली जाते अर्थात लहान मुलं ही होळी साजरी करतात. संध्याकाळी घरोघरी जाऊन मुलं लाकडं हक्काने मागून आणतात. डब्बे, छोटे वाजवण्याचे साहित्य घेऊन वाजवत, गात, मौज करत मुलं आपल्या आळीत कुडी(लाकडं) मागत फिरतात.

"कुडी द्या कुडी मारीन उडी, कुडी नाही दिली तर होळी कशी पेटेल"

अशा आशयाची गाणी गात लहान मुलं घरोघरी फिरतात. हल्ली लहान मुलांना शाळेमुळे वेळ कमी मिळतो आणि ह्या गोष्टी करता येत नाहीत, पण अजूनही काही ठिकाणी मुलं ह्या गोष्टींचा आनंद लुटतात. पूर्वी होळी असली की "आट्या-पाट्या" हा खेळ खेळला जात असे आता मात्र हे खेळ खूप कमी (किंवा नाहीच) खेळले जातात.

लाकडं, पालापाचोळा, वाळलेले गवत एका झाडाच्या फांदीभोवती रचले जाते, या फांदीस सरा म्हणतात ही फांदी अगदी सरळ असते. पूर्ण झाड न तोडता फक्त फांदी तोडली जाते त्यामुळे वृक्षतोड होत नाही, भेंडीचा(भेंड वृक्ष) सरा शक्यतो लावला जातो, काही ठिकाणी सुपारी  किंवा गावातील प्रथा पद्धती नुसार सरा असतो हे झाड फुटीर वृक्ष असल्याने पुन्हा नव्याने त्याला फांद्या येतात. . होळीला अग्नी देऊन मुलं नाचतात, आनंदाने मोठ्याने "होळी पेटली रे" म्हणून एक सुरात आवाज देतात.

होळी पौर्णिमा आणि त्याच्या आदल्या दिवशी मोठी मंडळी होळीत सहभागी होत असतात. वर्गणी गोळा करून लाकडे खरेदी केली जातात काही मंडळी आपल्या कडे उपलब्ध असलेली लाकडे होळीस आनंदाने देतात. वृक्ष तोडून कोणी होळी साजरी करीत नाहीत वाळलेली जुनी लाकडे वापरून होळी साजरी केली जाते. मोठ्ठा सरा आणून त्याभोवती लाकडे रचून रांगोळी काढली जाते. होळीस हार साखरेची माळ घातली जाते. घरातील लहान मुलांना देखील साखरेची माळ किंवा साखरेचे दागिने घातले जातात.

आद्य अगरबत्ती सुगंधी लोबान


स्त्रिया होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळी, उकडीचे मोदक करतात. होळीची पूजा, औक्षण, नारळ अर्पण करून एखादे नाणे वाहिले जाते व नैवैद्य दाखवला जातो.

रात्री १२ वाजता किंवा मुहूर्तावर होळीस अग्नी दिला जातो. या प्रसंगी स्त्रीया पुरुष लहान मुले तसेच पहिला होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या पतीसोबत माहेरी आलेल्या नवविवाहित कन्या, अशी मोठी फौज होळीवर एकत्र येते.

अल्पउपहार केला जातो, तसेच होळीत वाहिलेले नारळ बाहेर काढले जातात प्रसाद म्हणून भाजलेले खोबरे खूप चविष्ट लागते. पुरुष मंडळी होळीशेजारी बसुन जागरण करतात.

दुसऱ्या दिवशी आनंदाने धुलीवंदन साजरे केले जाते, घरोघरी जाऊन शक्यतो नैसर्गिक रंग लावून होळी साजरी केली जाते, पूर्वी फुले आणि झाडांपासून रंग तयार केले जात असत हल्ली कालानुरूप त्यात बदल झाले आहेत. तसेच पूर्वी होळीच्या विस्तवावर अंघोळीचे पाणी तापवित असत त्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही असा समज होता. रात्री विस्तवावर चणे, वालाच्या शेंगा,उकडले जातात आणि मंडळी एकत्र येऊन त्याचा आस्वाद घेतात.




धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याकडे वर्षभर काही ना काही कामासाठी येणाऱ्या गडी मंडळींना किंवा घरकाम करणाऱ्या ताईंना आनंदाने पोस्त द्यायची पद्धत आहे, पोस्त म्हणजे पौशाच्या स्वरूपात दिली जाणारी छोटीशी भेट.



अष्टागरात सर्वच ठिकाणी अशाप्रकारे होळी साजरी केली जाते काही ठिकाणी थोडा फार बदल असला तरी मूळ प्रथा सारख्याच आहेत. तुम्हा सर्वांना होळीच्या खुप शुभेच्छा.

धन्यवाद.








वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



Wednesday, March 17, 2021

अष्टागरातील साखरपुडा

 श्री गणेशाय नमः



नमस्कार,

मी अजित विनोद पंडीत, अष्टागरातील लग्नसमारंभ या शृंखलेच्या पुढच्या कडी मध्ये आपले सगळयांचे स्वागत. मागच्या भागात आपण "कुंकू लावणे" ह्या प्रथेबद्दल जाणून घेतलेत. आज आपण "वाङ्निश्चय" अर्थात साखरपुड्याबद्दल जाणून घेणार आहोत.

लग्न जमले आणि वधुस कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडला की वेध लागतात साखरपुड्याचे. बैठकीत किंवा कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात साखरपुड्याचा मुहूर्त पाहिला जातो, घरातील जाणती मंडळी पंचांग पाहून योग्य तो मुहूर्त काढतात किंवा गुरुजींना विचारून सवडीनुसार साखरपुडा ठरतो.

वधु आणि वरपक्ष दोन्ही कडे आनंदाचे आणि लगबगीचे वातावरण असते. शक्यतो साखरपुडा वधु पक्षाकडे असतो किंवा दोन्ही पक्ष सोयीनुसार ठिकाण ठरवतात. वधूपक्षाकडून किंवा ज्या पक्षाकडे कार्य असते त्या पक्षाकडून साखरपुड्याचे स्थळ, गुरुजी, भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था याची तजवीज केली जाते.

सगळ्यात आवडीचे म्हणजे दोन्हीही पक्षात खरेदी सुरू होते, वराचा पोशाख आणि अंगठी वधु पक्ष आणि वधूची साडी आणि अंगठी वरपक्ष खरेदी करतात. अर्थात वधू वराच्या आवडीनुसार खरेदी केली जाते. दोन्ही पक्ष एकमेकांशी संवाद साधून या सर्व गोष्टी करीत असतात, ह्यामध्ये दोन्ही पक्षातून प्रत्येकी एक व्यक्ती पुढाकार घेऊन संवाद साधतात किंवा लग्न जुळवून देणारी मध्यस्त व्यक्ती हे कार्य आनंदाने पार पाडत असते.

पाहुण्यांचे यथायोग्य स्वागत झाले की आपले आराध्य दैवत श्री गणेशाचे पूजन केले जाते वधु आणि वराचे आईवडील किंवा जवळचे नातेवाईक दांपत्य यजमानपद भूषवतात, गुरुजींच्या/ भटजींच्या उपस्थितीत सर्व कार्य केले जाते.







वरपक्षाकडून (वधूस पाटावर किंवा चौरंगावर बसवून) वधुची ओटी भरून साडीचोळी आणि सौंदर्य प्रसाधने दिली जातात तसेच पुष्पमाला घातली जाते. तसेच यथाशक्ती एखादा दागिना वधुस भेट दिला जातो. वरास देखील वधूपक्षाकडून पोशाख आणि यथायोग्य आहेर देवून सन्मान केला जातो तसेच पुष्पमाला घातली जाते. वधूचे तसेच वराचे पाच सुवासिनी औक्षण करतात. वधूची साखरपुड्यातील ओटी खास लग्नापर्यंत जपून ठेवली जाते.  

हिरव्या रंगाच्या साडीत वधु 


वधु वर दोघेही समोरच्या पक्षाकडून मिळालेला पेहेराव करतात, वधूची साडी शक्यतो हिरवी असते किंवा कुठल्याही शुभरंगाची असते. वधुवर एकमेकांना अंगठी घालून वाङ्निश्चय पार पाडतात तसेच एकमेकांना साखरपुडा दिला जातो.

वधु-वराच्या नातेवाईकांचा तसेच  करवलीचा दोन्ही पक्षांकडून मानपान केला जातो. सुवासिनीच्या ओट्या भरून त्यांचा सन्मान केला जातो. गजरा किंवा फुले दिली जातात. व्याही भेट होते तसेच इतर नातेवाईक उदा. वधू चे काका व वराचे काका एकमेकांस आलिंगन देऊन श्रीफळ देतात त्याच प्रमाणे स्त्रीवर्गात देखील एकमेकींना भेटण्याचा कार्यक्रम होतो. 

दोन्ही पक्षांकडून आणलेले पेढे एकत्र करुन पाहुण्यांना दिले जातात, तसेच आप्तस्वकीय व शेजाऱ्यांना वाटले जातात. आनंदाने स्नेहभोजन केले जाते वधुवरास उखाण्यात एकमेकांचे नाव घेण्याचा आग्रह नाही झाला तर नवलच.

लग्नाचा मुहूर्त, ठिकाण, वेळ याच वेळी निश्चित करण्यात येते. अशाप्रकारे आनंदात साखरपुडा संपन्न होतो.

पुढील भागात आपण "गहू टिपणे/ निवडणे" ह्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत.

धन्यवाद.

फोटो सौजन्य :- श्री अभिजित तिवाड व सौ अंकिता तिवाड.






वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...